
कुंडमळा दुर्घटनेनंतर दोन दिवस गायब असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना घटनास्थळी भेट द्यायला वेळ न मिळाल्याने झालेली टीका त्यांना झोंबल्याचे दिसून आले. श्रीक्षेत्र देहू येथे पत्रकारांशी बोलताना पवार यांनी आपल्यावर होणाऱ्या टीकेवर भडास काढली. ‘पहिल्या दिवशी जे बघून गेले ते फक्त बघून गेले, मंत्री म्हणून निस्तरावे आम्हालाच लागणार आहे. म्हणून शांत डोक्याने दोन दिवसांनंतर सर्व परिस्थितीची माहिती घेतली. माणुसकी आम्हालाही आहे,’
असेदेखील पवार म्हणाले.
कुंडमळा येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आपत्तिव्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. मात्र, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना घटनास्थळी भेट देण्यास दोन दिवस वेळ मिळाला नाही. त्यामुळे गायब असलेल्या पवार यांच्याबाबत चर्चेला उधाण आले होते.
पालखी सोहळ्याच्या प्रस्थानानिमित्त अजित पवार यांनी बुधवारी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिर आणि श्रीराममंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार सुनील शेळके, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. जालिंदर मोरे, ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प. वैभव महाराज मोरे, ह.भ.प दिलीप महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. विक्रमसिंह मोरे, ह.भ.प. उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे उपस्थित होते.
पवार म्हणाले, कुंडमळा दुर्घटनेनंतर पंधराव्या मिनिटाला आमच्या पक्षाचा आमदार घटनास्थळी होता. सर्व प्रशासकीय जबाबदार यंत्रणांना सूचना करत मदत देण्याचे आदेश दिले. असे असताना टीका सुरू झाल्या. बघणारे पहिल्या दिवशी बघून गेले. मात्र, आता मंत्री म्हणून आम्हाला सर्व निस्तरावे लागणार आहे. नागरिकांच्या प्रतिक्रिया शांत झाल्यावर या ठिकाणी भेट देऊन सर्व आढावा घेतला. या ठिकाणी नव्याने उभारण्यात येणारा पूल कसा असावा, त्या अनुषंगाने चर्चा केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.