
>> नीलेश कुलकर्णी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पदावर ‘संक्रात’ येणार का, अशी परिस्थिती सध्या आहे. ही स्थिती निर्माण करणारे गृहमंत्री अमित शहा मध्यंतरी त्या राज्यात गेले. एका समारंभात त्यांनी योगींचा त्रोटक उल्लेख करून योगींचे कडवे विरोधक उपमुख्यमंत्री केशव मोर्या यांचा प्रेमाने ‘मेरे प्रिय मित्र केशव मौर्याजी’, असा उल्लेख केला. गेल्या वेळी नियतीपेक्षा अंतर्गत राजकारणाने हिरावलेली मौर्यांची मुख्यमंत्रीपदाची संधी ‘केशव मेरे प्रिय मित्र’ हे विधान परत मिळवून देईल काय, असा सवाल विचारला जात आहे.
भाजपच्या श्रेष्ठीनी एखादा विडा उचलावा त्या पद्धतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना तेथून उचलण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. 2029 मध्ये भाजपला सत्ता मिळेल की नाही हे कोणालाच माहिती नाही. मात्र त्यापूर्वीच भाजपमध्ये गृहकलह भडकलेला दिसत आहे. मुख्यमंत्री योगी राहणार की जाणार यावर भाजपात गेल्या अनेक दिवसांपासून चर्वितचर्वण सुरू आहे. योगी हे कमालीचे जातीयवादी आहेत. त्या अहंकारातून ते सरकार चालवतात. स्वतःचा अजेंडा रेटतात, असे आरोप योगींवर झाले. त्यात तथ्यही आहे. मात्र योगींना हटविण्याच्या हालचालींमागे फक्त हीच रास्त कारणे नाहीत, तर येनकेनप्रकारेण योगी नकोच यासाठी दिल्लीतून या जातीय संघर्षाला वेगवेगळे रंग दिले जात आहे. समाजवादी पक्षाचे खासदार रामजीलाल सुमन यांच्यावर करणीसेनेने दिवसाढवळ्या हल्ले केले. मात्र योगींच्या दबावामुळे पोलिसांनी साधे गुन्हेही नोंदवले नाहीत. त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये ठाकूर विरुद्ध बिगर ठाकूर हे सामाजिक ध्रुवीकरण झाले आहे. भविष्यात हे ध्रुवीकरण समाजवादी किंवा बसपाच्या पथ्यावर पडू शकते. भाजपकडे मोठय़ा प्रमाणावर वळलेला बिगर प्रस्थापित जातींचा वर्ग पुन्हा भाजपपासून दूर जाऊ शकतो. त्याचा फटका भाजपला लोकसभा निवडणुकीतही बसला होता. त्याला योगींचे एकजातीचे राजकारण हे धोरण निःसंशय कारणीभूत आहे. आता या सगळ्या विषयांना हवा देण्याचे प्रयत्न दिल्लीतून होत आहेत. योगींना हटवून केशव मौर्यांना मुख्यमंत्री केले जाणार की थेट राष्ट्रीय अध्यक्ष बनवून दिल्लीकर त्यांना योगींचे ‘बॉस’ बनविणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. उत्तर प्रदेशात 2017 मध्ये प्रचंड बहुमताने भाजपचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या केशव मौर्या यांचाच मुख्यमंत्रीपदावर दावा होता. मात्र एका फाजील विधानाने मौर्या मुख्यमंत्री होता होता राहिले. दिल्लीकर योगींना रोखण्यासाठी सध्या ‘केशवा…केशवा’चा गजर करताना दिसत आहेत!
ईडीचा आगाऊपणा
राजकीय विरोधक राजकारणाच्या आखाडय़ात नामोहरम होत नसतील तर त्यांच्यामागे ईडी लावून त्यांना नामोहरम करण्याचा मंत्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अंमलात आणला जात आहे. विरोधकांची ‘राजकीय सुपारी’ ईडीवाले वाजवतातच. संजय मिश्रा हे ईडीचे संचालक त्याच एकमेव गोष्टीसाठी दिल्लीकरांचे ‘डार्ंलग’ बनले. तब्बल तीन वेळा सेवाविस्तार दिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने कान उपटल्यामुळे संजय मिश्रांना चौथ्यांदा सेवेत ठेवण्याचा सरकारचा इरादा धुळीस मिळाला. मिश्रा महाशयांनी ईडी सोडली असली तरी ईडीमागचे वादाचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाचे एक निःस्पृह वकील अशी ख्याती असणारे अरविंद दातार यांना ईडीने नोटीस बजावल्याने न्यायपालिकेत खळबळ उडाली आहे. दातार हे स्वच्छ चारित्र्याचे वकील मानले जातात. मात्र त्यांच्या अशिलाच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवरून दातारांना नोटीस पाठविण्याचा पराक्रम ईडीने केला. बार असोसिएशन आणि ऑन रेकॉर्ड् असोसिएशन या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविल्यानंतर ईडीने गुपचूपपणे दातारांना दिलेली नोटीस मागे घेतली आहे. ईडीने हा आगाऊपणा का व कोणाच्या सांगण्यावरून केला? ईडीच्या अस्त्राने आतापर्यंत राजकीय विरोधक घायाळ झालेले आहेतच. आता तशीच दहशत न्यायपालिका या लोकशाहीच्या दुसऱया स्तंभामध्ये निर्माण करण्याचा तर सरकारचा इरादा नाही ना, असा सवाल विचारला जात आहे. न्यायपालिकेला घाबरवून सोडण्याचे षड्यंत्र यामागे असू शकते, असा कयास लावला जात आहे.
‘रील’ मंत्र्यांविरोधात असंतोष
प्रशासकीय काैशल्य दाखविण्याऐवजी मोदी सरकारमधले मंत्री हे रीलमध्येच अधिक गुंतले आहेत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे पूर्वाश्रमीचे प्रशासकीय अधिकारी असणारे गृहस्थ मोदी सरकारमधले ‘रीलसम्राट’ आहेत. ओडिशामध्ये भीषण रेल्वे अपघात झाल्यानंतर जवळपास तीनशेच्या आसपास लोक मृत्युमुखी पडल्यानंतर वैष्णव यांनी केलेले रील शूट वादाच्या भोवऱयात अडकले होते. अपघातग्रस्तांना मदत करतानाचे रील काढल्यामुळे त्यांच्यावर रेल्वेऐवजी ‘रीलमंत्री’ अशी टीका होते. आता या श्रेणीत केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री रामा नायडू आले आहेत. नायडू तरुण आहेत. मात्र अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी झालेली असताना हे तरुणतुर्क रील बनवताना दिसले. त्यामुळे ते जनतेच्या रडारवर आहेत. रामा यांचे वडील ज्येष्ठ नेते येरेन नायडू एका अपघातातच गेले. त्यामुळे किमान रामा यांच्यासारख्यांनी अपघातग्रस्तांबाबत संवेदनशीलता दाखवायला हवी होती. देशाच्या विदेश नीतीमध्ये कुचकामी ठरलेले जयशंकर यांचे चेलेचपाटे त्यांचा ‘आँखो मे अंगार है..’ टाईपचे रील करताना दिसत आहेत. मात्र जयशंकर यांच्या रीलच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळलेली आहे. लोक उत्स्फूर्तपणे जयशंकर यांचे मीम्स बनवत आहेत. ट्रम्पतात्यांना ज्यांनी डिअर फ्रेंड म्हणून संबोधले त्या स्वयंघोषित डिअर फ्रेंडची वाट लावण्याची एकही संधी सध्या ट्रम्पतात्या सोडत नाहीयेत. त्यामुळे देशाच्या पंतप्रधानांवरही मीम्सचा महापूर येण्याची दाट शक्यता आहे.