शालेय शिक्षण विभागाचे वरातीमागून घोडे, शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांच्या गणवेश आणि बुटांसाठी निधी

राज्यात शाळा सुरू झाल्यावर शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट आणि पायमोजे यासाठी शालेय शिक्षण विभागाने 53 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. त्यामुळे यंदाचे शालेय शिक्षणाचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत.

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना मोफत गणवेश देण्यात येतो. या योजनेंतर्गत प्रति गणवेश 300 रुपयांप्रमाणे दोन गणवेश देण्यासाठी 600 रुपये खर्च तर एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे यासाठी 170 रुपयांची रक्कम खर्च करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत सुमारे 14 कोटी 80 हजार 300 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची विनंती शालेय शिक्षण विभागाला करण्यात आली होती. राज्याच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीपैकी एकूण 87 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्यानंतर उर्वरित 53 कोटी 80 हजार 300 रुपयांचा निधी शालेय शिक्षण विभागाने वितरित केला आहे.

राज्याच्या तिजोरीत निधी नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश, बूट आणि पायमोजे यांच्यासाठी निधी वितरित करण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात येते. आता शाळा सुरू झालेल्या आहेत. आता निधी वितरित झाला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत नवीन शालेय उपयोगी हे साहित्य पोहोचण्यासाठी एक-दोन महिन्यांचा कालावधी लागेल असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.