महाराष्ट्राचे मराठीपण नष्ट करण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे; संजय राऊत यांचा घणाघात

महाराष्ट्राचे आणि मुंबईचे मराठीपण संपवण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्रावर हिंदी लादून मुंबई कोणाच्यातरी घशात घालत मराठी माणसाला हद्दपार करण्याचे कारस्थान सुरू आहे, मात्र शिवसेना हे कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नते, खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नसताना फक्त महाराष्ट्रावर हिंदी का लादण्यात येत आहे, असा सवालही संजय राऊत यांनी केला.

महाराष्ट्राचे मराठीपण संपवण्याचा भाजपचा डाव आहे. हिंदीची सक्ती गुजरातमध्ये नाही. तसेच जाहीर सभेत पंतप्रधान मोदी गुजराती जनतेला विचारतात की, हिंदीची सक्ती तुम्ही सहन करला का, अशी मोदींची जाहीर सभेतील वक्तव्ये आहेत.असे असताना हिंदीची सक्ती देवेंद्र फडणवसी महाराष्ट्रावर का लादत आहेत? मराठी भाषेच्या शाळा अधिक अभिजात आणि दर्जेदार होण्यासाठी त्यांनी कार्य केले पाहिजे. मात्र, महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत मराठी भाषेच्या शाळा बंद पाडल्या जात आहेत. हे अतिक्रमण आहे. त्यातच आता हिंदी सक्तीची करण्यात येत आहे, असे संजय राऊत म्हणाले.

हेंमत दिवटे यांच्यासारख्या कवींनी हिंदीसक्तीविरोधात त्यांचा राज्य सरकारचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्यासारख्या कवी, साहित्यिक आणि लेखकांनी सक्तीच्या हिंदीविरोधात भूमिका घेतली आहे. मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह महाराष्ट्राचे मराठीपण संपवण्याचे कारस्थान सुरू आहे. त्याविरोधात आवाज उठवायलाच हवा. त्यामुळेकवी, लेखक, साहित्यिक, अभिनेते यांनी हिंदी सक्तीविरोधात घेतलेली भूमिका योग्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. आता लवकरच विधानसभा सुरू होईल. याबाबत सरकारला जाब विचारण्याचे ते योग्य व्यासपीठ आहे. शिवसेना सरकारला याचा जाब विचारणार आहे. मराठीची गळचेपी का सुरू आहे, हिंदी का लादण्यात येत आहे. मराठीवर आक्रमण वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे काय? महाराष्ट्राच मराठीपण संपवण्याचे कारस्थान राष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. कोणाच्या तरी घशात मुंबई घालयची आहे. मराठी आणि मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी हे सुरू असेल तर शिवसेना हे खपवून घेणार नाही. महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठीच शिवसेनेचा जन्म झाला आहे. या भूमिकेवर आम्ही ठाम आहेत. 106 हुतात्मांनी मराठी आणि महाराष्ट्रासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे मराठीवर अन्याय होत असेल तर आम्ही लढा देणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले.