
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी तब्बल 26 पर्यटकांचा बळी घेणारे हेच ते हल्लेखोर असे स्पष्ट करत जम्मू-कश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांचे स्केच जारी केले. परंतु, स्केच जारी केलेले तिघेही पहलगामचे हल्लेखोर नसल्याचे समोर आले असून मोदी सरकारने देशवासियांना गंडवल्याचे उघड झाले आहे. हल्ल्यातील दहशतवादी पाकिस्तानचे नागरिक आणि लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे होते, अशी माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे सरकार तोंडघशी पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
बैसरन येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना स्थानिक नागरिक परवेज अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर यांनी पहलगामच्या हिल पार्क परिसरात आपल्या झोपडीत आश्रय दिल्याचे समोर आले. त्यानंतर एनआयएने दोघांना अटक केली. हल्ल्यानंतर तत्परता दाखवत जम्मू-कश्मीर पोलिसांनी तीन संशयित दहशतवाद्यांचे स्केच जारी केले होते. यात पहलगाममधील दहशतवादी आदील हुसेन ठोकर आणि दोन पाकिस्तानी नागरिक हाशीम मुसा तसेच अली भाई यांच्या नावांचा समावेश होता. परंतु एनआयएच्या तपासात हे तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्यात सहभागी नव्हते, अशी माहिती समोर आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या जबाबानुसार आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी पहलगामचा हल्ला घडवून आणला होता, अशी माहिती समोर आली.
जम्मू-कश्मीर पोलिसांनी ज्या दहशतवाद्यांचे स्केच जारी केले ते पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी नाहीत, अशी माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली.
अटक आरोपींना पाच दिवसांची एनआयए कोठडी
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली रविवारी एनआयएने दोघांना अटक केली होती. या दोघांना आज जम्मूच्या कोर्टात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली. परवेज अहमद जोठार आणि बशीर अहमद जोठार अशी या आरोपींची नावे आहेत. दोघांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटवली असून ते पाकिस्तानी नागरिक होते तसेच लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी त्यांचा संबंध असल्याची माहिती दिल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. दरम्यान, उधमपूर जिह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला दहशतवादी मोहम्मद शफीक याची स्थावर मालमत्ता आज जप्त करण्यात आली.
मग ते दहशतवादी कुठे आहेत – काँग्रेसचा सवाल
दहशतवाद्यांचे स्केच जारी करण्यासाठी पोलिसांवर वरून दबाव होता का? अखेर पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठे लपले आहेत, ते कोण आहेत आणि त्यांचा खात्मा कधी करणार, असे सवाल देशातील नागरिक करत आहेत, असे काँग्रेसने म्हटले आहे. घाईघाईत पोलिसांनी दहशतवाद्यांचे चुकीचे स्केच जारी केले. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचा हा हेडलाईन मॅनेजमेंटचा प्रकार होता का, असा सवाल काँग्रेसने केला.