
कर्नाटकातील रायचूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरदरम्यान संपूर्ण देश सैन्यासोबत खंबीरपणे उभा होता. यावेळी देशाने एकजूट दाखवली. मात्र, भाजपने लष्कराच्या आणि सैनिकांच्या शौर्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. भाजप सीमेवर जाऊन कॅप्टन, कर्नल, लेफ्टनंट किंवा जनरलसारखे लढला असता तर आम्ही त्यांना सलाम केला असता, असे ते म्हणाले. ज्यांचे युद्धात कोणतेही योगदान नव्हते, आता त्यांनी त्याचे श्रेय घेण्यास सुरुवात केली आहे, अशा शब्दांत खरगे यांनी संताप व्यक्त केला.
या गंभीर मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली होती. पंतप्रधान मोदींना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती करणारा मी पहिला व्यक्ती होतो. बैठक दोनदा बोलावण्यात आली होती, परंतु दोन्ही वेळा पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले नाहीत. ते देशात उपस्थित होते, तरीही ते आले नाहीत, तर काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पक्षांचे नेते त्यात सहभागी झाले होते. विरोधी नेत्यांसोबत असे वर्तन देश कधीही सहन करणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.
सैनिक सीमेवर लढत होते, तेव्हा पंतप्रधान मोदी बिहारमध्ये प्रचारात व्यस्त होते. त्यावेळी आपण सर्वजण राष्ट्रीय हितासाठी एक होतो, परंतु मोदीजी प्रत्येक घटनेत फक्त त्यांच्या पक्षाचा फायदा पाहतात. आमच्यासाठी देश प्रथम येतो. आम्ही कधीही कोणाला घाबरायला शिकलो नाही, किंवा कधीही आव्हानापासून मागे हटलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. बांगलादेश युद्ध झाले तेव्हा अमेरिकेने आपला 7 वा ताफा पाठवला. एक प्रचंड लष्करी तुकडी, जी एका शहराइतकी मोठी होती आणि शस्त्रांनी सुसज्ज होती. त्यावेळी इंदिरा गांधी शौर्याने लढल्या. देशाच्या सुरक्षेसाठी, बांगलादेशातील लोकांना मदत करण्यासाठी आणि शेजारच्या भागात शांतता राखण्यासाठी त्यांनी जगाचा सामना केला, याची आठवणही खरगे यांनी करून दिली.