रायगडात लाडक्या बहिणींवर अत्याचार, पाच महिन्यांत 36 बलात्कार, 78 जणींचा विनयभंग

लाडक्या बहिणींच्या नावावर एकीकडे सत्ताधारी राजकारण करीत असतानाच दुसरीकडे रायगड जिल्ह्यात मात्र लाडक्या बहिणींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. जानेवारी ते मे अशा पाच महिन्यांत 36 जणींवर बलात्कार झाला असून 78 महिलांचा विनयभंग केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे रायगडचे पालकमंत्रीपद एका महिलेकडे असतानाही जिल्ह्यातील महिला सुरक्षित नसल्याने संताप व्यक्त होत आहे. राज्याचे गृहखाते नेमके करते काय, असा प्रश्न यानिमित्ताने विचारण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यात बलात्कार व विनयभंगाचे गुन्हे वाढले असून दर आठवड्याला सरासरी तीन ते पाच महिला बळी पडत आहेत. या गुन्ह्यांची उकल करून आरोपींना गजाआड करण्यात यश आल्याचे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. 95 टक्क्यांहून अधिक गुन्हांची उकल केल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला आहे, पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असून जिल्ह्यातील महिलांवर अत्याचार वाढत असल्याचे दिसून आले आहे.

आहे दामिनी पथक तरीही…
रायगड जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची निर्मिती केली आहे. त्यांना मोटारसायकल चाल विण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच या पथकाला विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, समुद्रकिनारे आणि गर्दीच्या ठिकाणी या पथकाची नियमित गस्त सुरू असते. या पथकांचे फोन नंबर शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी आणि महिलांना उपलब्ध करून दिले आहेत. एवढे प्रयत्न करूनही महिलांसंबंधी गुन्हे कमी झाले नसल्याचे चित्र गुन्ह्यांची आकडेवारी पाहिल्यानंतर दिसून येत आहे.

बाजारात गर्दीच्या ठिकाणी, प्रवासात महिला प्रवाशांशी अंगलट, अल्पवयीन विद्यार्थिनींशी चाळे, महाविद्यालय आवारात छेड काढणे असे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडतात.
लग्नाचे आणि नोकरीत बढती देण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध केल्याच्या तक्रारीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.
पूर्वी अत्याचाराला बळी पडलेल्या महिला बदनामीला घाबरून गप्प बसत असत. मात्र आता रायगडातील महिला आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवू लागल्या आहेत.