बंगाली बोलणाऱ्यांवर हल्ले, भाजप डेंजर गेम खेळतोय! मातृभाषेत बोलणे हा या देशात गुन्हा आहे काय? ममतांचा संताप

भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषा बोलणाऱया नागरिकांवर बांगलादेशी असल्याचा ठप्पा लावला जात असून त्यांच्यावर हल्ले केले जात आहेत. अशाप्रकारे बंगाली नागरिकांना टार्गेट करून भाजप डेंजर गेम खेळतोय, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. तसेच बंगाली नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत टार्गेट करू देणार नाही, असा इशाराही मोदी सरकारला दिला.

मातृभाषेत बोलणे हा या देशात गुन्हा आहे काय? असा सवाल करत भाजपच्या कूटनीतीबद्दल ममता बॅनर्जी यांनी प्रचंड संतापही व्यक्त केला. मुख्यमंत्री दालनात ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजस्थानात तब्बल 300 ते 400 स्थलांतरित मजुरांना वैध कागदपत्र दाखवूनही एका इमारतीत डांबून ठेवण्यात आल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या देशात बंगाली भाषा बोलणे गुन्हा आहे का? बंगाली भाषा रवींद्रनाथ टागोर आणि स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तींची आहे. मला वाटते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे माहीत नसावे, त्यांच्या निदर्शनास मी ही बाब आणून देऊ इच्छिते, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

आम्ही स्थलांतरित मजुरांना टार्गेट करण्याचा विचारही करणार नाही

माझ्या माहितीप्रमाणे 1971 पर्यंत हिंदुस्थानात आलेला प्रत्येक नागरिक हा हिंदुस्थानी आहे. विविध राज्यांमधील तब्बल दीड कोटी स्थलांतरित मजूर किंवा कामगार बंगालमध्ये विविध ठिकाणी काम करत आहेत. परंतु, आम्ही त्यांना भाजपाप्रमाणे टार्गेट करण्याचा विचारही करू शकत नाही, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. जर आम्ही इतर राज्यांमधून आलेल्या आणि त्यांची मातृभाषा बोलणाऱया नागरिकांना टार्गेट केले तर काय होईल, असा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला.

दिल्ली विद्यापीठातून बंगाली भाषा हद्दपार

दिल्ली विद्यापीठात बंगाली भाषेचाही पर्याय होता. परंतु, ही भाषाच तेथून हद्दपार करण्यात आली. सरकारच्या या कृत्याबद्दल प्रचंड खेद वाटतो, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. बंगाली भाषिकांना टार्गेट केले जात आहे, ही गोष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना माहीत नाही का? बंगालमधील जवळपास 2 लाख स्थलांतरित कामगार विविध राज्यांमध्ये काम करत आहेत. मी त्या नागरिकांना आपल्याच राज्यात काम करण्याचे आवाहन केले. परंतु, नोकरीच्या शोधात अनेकजण विविध राज्यांमध्ये जातात. त्यांच्याकडे वैध कागदपत्रे असतात. मग केवळ ते बंगाली भाषा बोलतात म्हणून त्यांना टार्गेट केले जात आहे का? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला केला.

  • राजस्थानप्रमाणेच दिल्ली, मध्य प्रदेशसह ज्या ठिकाणी भाजपाचे सरकार आहे त्या राज्यांमध्ये बंगाली भाषा बोलणाऱया नागरिकांना टार्गेट केले जात आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला. राजस्थानात घडलेल्या घटनेप्रकरणी पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजस्थानातील मुख्य सचिवांशी चर्चा करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. अलीकडेच भिवंडी, नबान्ना येथे बंगाली नागरिकांना टार्गेट करण्याच्या घटना घडल्याची माहिती सूत्रांमार्फत मला मिळाल्याचा दावाही ममता बॅनर्जी यांनी केला.