नव्या कोऱ्या महामार्गावर खड्ड्यांची ‘समृद्धी’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग खड्डय़ांनी छिन्नविछिन्न झाला आहे. या नव्या कोऱया महामार्गावर खड्डय़ांची समृद्धी दिसत आहे. अवघ्या वीस दिवसांपूर्वी लोकार्पण झालेल्या समृद्धीच्या इगतपुरी ते आमणे रस्त्यावर खड्डेच खड्डे झाल्याने वेगाने जाणाऱया बाईकस्वारांसाठी जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे.

इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण 5 जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. तिघांनी त्या महामार्गावरून गाडीतून प्रवासही केला होता. त्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता; पण त्याच मार्गावरील शहापूर येथील पुलावर सर्वत्र खड्डे पडले असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कंत्राटदारावर कारवाई करा

समृद्धीवरील हे खड्डे पाहून वाहनचालकांच्या काळजात धस्स होत आहे. अशाच कामासाठी जनता कर भरते का, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या महामार्गाचे तातडीने ऑडिट करून संबंधित पंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे अशी वाहनचालकांची मागणी आहे.

ही पहिलीच वेळ नाही

यापूर्वी एप्रिल महिन्यात समृद्धी महामार्गावर आमणे आणि शहापूरदरम्यान काँक्रीटला तडे गेल्याचे समोर आले होते. याच महामार्गावर इगतपुरी-कसारा घाट मार्गात 17.6 किलोमीटरचा देशातील सर्वात लांब बोगदा तसेच 7.78 किलोमीटर लांबीचे दोन दुमार्गी बोगदे आहेत.

अपघातांचा धोका वाढला

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी सिमेंट काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. फक्त पुलांवरील रस्त्यांसाठी अस्फाल्टचा वापर केला गेला आहे. इगतपुरी-आमणे टप्प्यासाठी 1182 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ताशी 100 ते 120 किलोमीटर वेगाने या महामार्गावरून गाडय़ा धावतात. खड्डय़ांमुळे त्यांचा भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.