अजितदादांच्या खात्यावर वॉच ठेवण्याचे फर्मान, मंत्रालयात मिंध्यांचे समांतर सरकार

ajit-pawar-eknath-shinde

रुसव्याफुगव्यानंतर आता मिंध्यांनी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून समांतर सरकार चालवायला सुरुवात केली आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची नियमित बैठक झाल्यानंतर मिंध्यांनी आपल्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक घेत आपल्या मंत्र्यांना अजितदादांच्या खात्यावर ‘वॉच’ ठेवण्याचे फर्मान सोडले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री निधी देत नसल्याचा कांगावा करत मिंध्यांनी 40 आमदारांसह शिवसेनेशी गद्दारी करून भाजपशी घरोबा केला. आता महायुतीच्या तंबूत सत्तेसाठी अजित पवार आणि मिंधे एकत्र आले आहेत. मात्र निधी वाटपावरून दोघांमध्ये सतत धुसफूस चालू असते. ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवल्यानंतर त्या खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी बराच थयथयाट केला. परंतु फडणवीसांनी डोळे वटारताच शिरसाट यांची बोलतीच बंद झाली. ‘अजित पवार आम्हाला निधीच देत नाहीत, विकास कामे करायची कशी?’ असा तक्रारीचा सूर मिंध्यांच्या आमदारांनी लावला आहे. अमित शहांच्या नांदेड दौऱयात भाजप आमदारांनीही निधीवरून कुरबूर केली.

निधी अडवल्याने नाराजी

अजित पवार यांच्या निधी अडवण्याच्या भूमिकेवरप बहुतेक मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर मिंध्यांनी अजित पवारांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवा, असे मंत्र्यांना सांगितले. अजित पवारांच्या खात्यात 14 हजार कोटींचे दोन निधी आहेत. ते कुठे वितरित होतात याकडे लक्ष ठेवा, अशी सूचना मिंध्यांनी केली. या बैठकीनंतर मिंध्यांनी निधी वाटपात समानता आणावी, या मागणीसाठी अजित पवारांची भेटही घेतल्याची माहिती आहे.