दहावीची परीक्षा दोनदा होणार, सीबीएसई बोर्डाचा निर्णय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा घेण्यात येणार असून, पहिली परीक्षा अनिवार्य तर दुसरी ऐच्छिक असणार आहे. परीक्षेचे मूल्यांकन मात्र एकदाच होणार असून, दुसऱया परीक्षेत विद्यार्थ्यांना गुण वाढवण्याची संधी मिळणार आहे.

2026 पासून हा निर्णय अंमलात येणार आहे. केंद्राच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सीबीएसईने सांगितले. फेब्रुवारीमधील परीक्षा सर्वांसाठी अनिवार्य आहे. मे महिन्यातील परीक्षा ऐच्छिक असेल. पहिल्या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये तर दुसऱया परीक्षेचा निकाल जूनमध्ये लावण्यात येईल. परीक्षेचे मूल्यांकन मात्र एकदाच होणार आहे. फेब्रुवारीतील परीक्षेत गणित, सामाजिकशास्त्र आणि भाषा यापैकी तीन विषयांत कमी गुण आल्यास दुसऱया परीक्षेत गुण वाढवण्याची संधी मिळणार आहे.