
अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात तब्बल 5 शतके ठोकूनही टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. हिंदुस्थानी संघाचा युवा कर्णधार शुभमन गिलने या पराभवाचे खापर आपल्या क्षेत्ररक्षकांवर फोडले. क्षेत्ररक्षणांनी अनेक झेल सोडल्याने हातातील सामनाही निसटला, अशा शब्दांत गिलने टीम इंडियाच्या पराभवाचे विश्लेषण केले.
गिल म्हणाला, हेडिग्ले कसोटीत टीम इंडियाला जिंकण्याची संधी होती. मात्र, अनेक झेल सुटले. त्यातच तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्याने टीम इंडियाला दुहेरी फटका बसला. पहिल्या डावात अखेरच्या सात विकेट्स केवळ 41 धावांत पडल्या, तर दुसऱया डावात अखेरचे सहा फलंदाज अवघ्या 31 धावांवर गारद झाले. इतक्या चुका झाल्यावर विजय मिळविणे शक्यच नाही. दुसऱया डावात 430 धावांपर्यंत जाण्याचे डावपेच होते. मात्र, 31 धावांवर 6 फलंदाज बाद झाल्याने केवळ 364 धावसंख्येवरच टीम इंडियाचा डाव गडगडला. तरीही गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत कसोटीत रंगत निर्माण केली होती.
जाडेजाला खेळणे अवघड – डकेट
इंग्लंडला पहिली कसोटी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱया बेन डकेटने रवींद्र जाडेजाला खेळणे अतिशय अवघड असल्याची कबुली दिली. चौथ्या दिवशी एकही विकेट न गमविण्याची योजना यशस्वी ठरली. अखेरच्या दिवशी शेवटपर्यंत खेळत राहिल्यास विजय मिळेल हीच आमची रणनीती होती. जाडेजाचा यशस्वी सामना केला. हळूहळू धावाही होत गेल्या. त्यामुळेच पहिली कसोटी जिंकता आली, असे ‘सामनावीर’ ठरलेल्या बेन डकेटने सांगितले.