
कराड शहरातील 67 इमारती सध्या धोकादायक स्थितीत असून, त्यांचे मालक इमारती उतरवण्याच्या नोटिसांकडे वारंवार दुर्लक्ष करीत आहेत. 40 वर्षांपूर्वी दगड, माती, लाकडापासून बांधलेल्या इमारतींची अवस्था गंभीर झाली आहे. काही इमारतींचे दरवाजे, भिंती खराब झाल्या असून, त्या खाली झुकलेल्या व कडीपाड खचलेले आहेत.
शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी असलेल्या या इमारती पावसाळ्यात कोसळण्याचा धोका वाढला असून, त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. काही इमारतींच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामांमुळेही त्यांचे ढासळण्याचे संकट आहे.
न्यायालयीन वाद, भाडेवाद इत्यादी कारणांमुळे अनेक इमारती वर्षानुवर्षे तशाच अवस्थेत आहेत. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नगरपालिका धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून नोटिसा बजावते. यंदाही 23 मे रोजी नगरपालिकेने इमारत मालकांना तातडीने इमारती उतरविण्यास बजावत होणाऱ्या दुर्घटनेस नगरपालिका जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तरीही इमारत मालकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही.
विशेषतः शनिवार पेठेत सर्वाधिक धोकादायक इमारती असून, गुरुवार पेठ व रविवार पेठेत प्रत्येकी 12 इमारती असुरक्षित स्थितीत आहेत. इमारती नीट दिसत असल्या तरी त्यातील वीट, दगड निसटण्याचा धोका वाढला आहे. तरीही इमारत मालक तात्पुरती डागडुजी करून इमारती वापरत आहेत. अशा इमारतींमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असून, इमारत मालकांनी वेळीच पावले उचलण्याची आवश्यकता आहे.