नवी मुंबईला भीती बाहेरच्या चोरट्यांपासून ऑक्सिजन चोरला, औषधे चोरली, पाणीही चोरले; गणेश नाईकांचा रोख कुणावर?

नवी मुंबई शहराचे वैरी हे नवी मुंबई शहरातील नाहीत तर बाहेरील चोर आहेत. या चोरांनी कोरोनाकाळात नवी मुंबईतील ऑक्सिजन चोरला, औषधे चोरली, पाणीही चोरले. त्यामुळे शहराच्या बाहेरील या चोरांना आता पायबंद घालावाच लागेल, असा घणाघात वनमंत्री गणेश नाईक यांनी केला. नाईकांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख नेमका कुणावर होता, त्यांनी स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला की मिंधेंना लक्ष्य केले, याची चर्चा सध्या शहरात सुरू झाली आहे. महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली असतानाच नाईक आक्रमक झाल्यामुळे महायुतीच्या वर्तुळात चलबिचल सुरू झाली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, नवी मुंबई शहराची सध्या लूट सुरू आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मोठ्या संख्येने भूखंड बिल्डरांच्या घशात घातले आहेत. या भूखंडाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक सुरू असताना सिडकोने भूखंडाचे टेंडर काढले आणि हे भूखंड विकून टाकले. नवी मुंबईमधील नेते आणि पदाधिकारी हे या शहराचे वैरी नाहीत. बाहेरच्या वैरी आणि चोरांपासून शहराला मोठा धोका आहे. तुमची चोरगिरी थांबवा, असा इशारा आता या चोरांना दिला आहे, असेही गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

पोशीर धरणाचे पाणी बुक केले
नवी मुंबई शहराला सध्या मुबलक पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे या शहराला कधीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत नाही. नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येलाही पाणी कमी पडू नये यासाठी पोशीर धरणाचे ५०० एमएलडी पाणी बुक करण्यात आले आहे. त्यासाठी ५०० कोटी रुपये मोजण्यात येणार आहेत. काही पाणीचोरांनी शहराचे पाणी चोरले, म्हणून हा निर्णय घ्यावा लागला आहे असेही गणेश नाईक यावेळी म्हणाले.

मिंधे-भाजपमधील वाद विकोपाला
नवी मुंबईत मिंधे गट आणि भाजपमधील राजकीय वाद आता विकोपाला गेला असून त्याचे रूपांतर आता व्यावसायिक वादात झाले आहे. मध्यंतरी एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना मिळालेला भूखंड सिडकोने अचानक रद्द केला. या भूखंडावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे वर्चस्व होते. याचा बदला घेण्यासाठी भाजपवाल्यांनी उलवे येथे एका बिल्डरला मिळालेल्या भूखंडामध्ये आडकाठी आणली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि मिंधे गटातील वाद उफाळून येऊ लागल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली आहे.