हातचलाखी लपत नसते श्रीमान सीएम जी! वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी; अंबादास दानवे यांनी केली पोलखोल

राज्यातील वीजग्राहकांसाठी वीजदर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, वीजदर कमी करण्याची घोषणा फसवी असून ही हातचलाखी असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आकडेवारी जाहीर करत ही हातचलाखी आणि फसवाफसवी उघड करत या घोषणेची पोलखोल केली आहे.

राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरवण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला असून घरगुती, औद्योगिक तसेच व्यावसायिक अशा सर्वच ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के आणि पुढील पाच वर्षांत सव्वीस टक्क्यांपर्यंत दर कमी होतील. मात्र, हे फसवे असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे.

दानवे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, हातचलाखी! 70 टक्के ग्राहकांचे वीजबिल सरासरी किती आणि उर्वरितांचे किती, हे देखील जाहीर व्हायला हवे. ज्यांची बिल रक्कम जास्त त्यांना हा दिलासा नाही. उलट त्यांना वीज महाग. दिलासा द्यायचा असेलच तर सर्वांना दिला गेला पाहिजे. ही हातचलाखी लपत नसते श्रीमान सीएम जी! यासोबत त्यांनी आधीचे आणि आताचे दर यांची माहिती देत 101 युनीटपेक्षा जास्त वापर असणाऱ्या ग्राहकांचे वीजबिल वाढणार असल्याचे दाखवून दिले आहे.