सिनेविश्व – आम्ही वेगळे झालोय…

>> दिलीप ठाकूर

सनेमावाल्यांच्या संसारातील धुसफुस गॉसिप्स मॅगझिनमधून समजायची आणि आज ते स्वतःच सोशल मीडियातून सांगतात की, आम्ही वेगळे झालो बरं का? हे ऐकणे/ वाचणे आज इतकं सवयीचं होत चाललंय की, त्यातून कोणताही सांस्कृतिक धक्का वगैरे बसत नाही.

फार पूर्वी गमतीत म्हटलं जाई… लग्नाच्या पहिल्या वर्षी पती बोलतो, पत्नी ऐकते. दुसऱ्या वर्षी पत्नी बोलते, पती ऐकतो आणि त्यानंतर दोघेही बोलतात, शेजारीपाजारी ऐकतात. त्या काळात घटस्फोट म्हणजे कसोटी क्रिकेट सामन्यात एखादा षटकार बसण्याइतके दुर्मिळ होते. सिनेमावाल्यांच्या संसारातील धुसफुस गॉसिप्स मॅगझिनमधून समजायची आणि आज ते स्वतःच सोशल मीडियातून सांगतात की, आम्ही वेगळे झालो बरं का? हे ऐकणे/ वाचणे आज इतकं सवयीचं होत चाललंय की, त्यातून कोणताही सांस्कृतिक धक्का वगैरे बसत नाही. त्यांचं जमत नसेल, झाले वेगळे. हाय काय नाय काय?

लता सबरवाल हिने सोशल मीडियात पोस्ट करत म्हटलंय, ‘संजीव सेठसोबतचा पंधरा वर्षांचा संसार थांबवलाय. आम्ही वेगळे झालोय.’ हे वाचताना जितके सोपे वाटते तितका सहज घटस्फोट होतो? संसार म्हटल्यावर एकमेकांत गुंतत गुरफटून जाणं म्हणतात, त्याचं प्रमाण आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपण्याची हौस यामुळेच कमी होतंय? मनोरंजन क्षेत्रात लग्नानंतर ‘मी इथे, तो तिथे कुठेतरी’ अशी काही उदाहरणं दिसतात, तर कधी सहज घटस्फोट होताना दिसतात. पतीला वा पत्नीला सोशल मीडियात अनफॉलो केलं, डीपी बदलला, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, लग्नाचा वाढदिवस साजरा केला नाही की, त्यांचं काहीतरी बिनसलंय याचे सिग्नल मिळत जातात. कुठे कुठे लक्ष ठेवावं लागतंय बघा. त्याच्या बातम्या होतात. कालपर्यंत चित्रपट कसा आहे, आपली भूमिका कशी आहे, आपण त्याची तयारी कशी केली, दिग्दर्शकाने कसा विचार केला यावर फोकस असे म्हणून चित्रपट रसिकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता असे. आज काही कलाकार आपण घटस्फोट कसा सेलिब्रेट केला, आपला पहिला घटस्फोट यावर इतक्यांदा बोलतात की, तेव्हा स्वतच्या गुणवत्तेला विसरतात का काय? असा प्रश्न पडतो. उत्तम गुणवत्ता असलेली सई ताम्हणकर आज चित्रपट व वेब सीरिजमधून केवढं वैविध्य व क्षमता दाखवतेय. विशेष कौतुक व्हायला हवं. तरी जवळपास प्रत्येक मुलाखतीत आपला घटस्फोट यावरच बोलते आहे.

फार पूर्वी कलाकार आपले खाजगी आयुष्य गॉसिप्स मॅगझिनपुरते ठेवत. आपलं व विनोद मेहराचं बिनसलं म्हणून आपण शिळा उपमा खाल्ला असं रेखाने पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तेव्हा समजलं. त्यांचे संबंध लग्नापर्यंत पोहोचले होते. रेखाबद्दल तब्बल पंचावन्न वर्षे सतत काहीना काही गॉसिप्स रंगत आलंय. तरी तिच्या ‘उमराव जान’, ‘खुबसूरत’, ‘घर’, ‘सिलसिला’ अशा चित्रपटातील भूमिका हीच तिची ओळख. आज सोशल मीडिया युगात आपलं लग्न, आपला उखाणा हे जसं छान दिसतं तसंच कोणीतरी पती-पत्नीच्या नात्यातून वेगळं झालंय हे सांगतंय. आमीर खान आपल्या नवीन मैत्रिणीची माहिती देतो.

आपणच हे का सांगावं? कारण अशा गोष्टी लपवून ठेवल्या तर उगाच त्यावरून कोणी अक्षरशः काहीही बोलायला लागतं. ट्रोलिंगची शक्यता असते. ती चांगलं वागले तरी असू शकते. कधी वकिलाला भेटायला गेल्याची बातमी फुटलीच तर ‘घटस्फोट फाइल’ बातमी होण्याची शक्यता.

सेलिब्रिटीज असण्याची बेरीज-वजाबाकी फारच आहे. सुखाने संसार करत करत नाटक, चित्रपटांतून काम करायचं तर एखादी मध्यमवयीन चाहती भाबडेपणाने विचारते, “अगं, दोघांचं तिघे कधी करताय?” हे घडलंय, असं घडतंय.

अभिनयाशिवाय अशाच गोष्टींची ‘लय भारी’ चर्चा चालतेय. मग आपणच सोशल मीडियात सांगितलेलं बरं! आपलं काय चाललंय…काय घडतंय… काय बिघडलंय…

[email protected]

(लेखक सिनेपत्रकार समीक्षक आहेत)