सीतास्वरुपा – आंतरिक लढाई

>> वृषाली साठे

ध्यानात असताना पार्वती माता सीतेला सांगते की, ‘‘महादेवाने त्यांचा एक अंश पृथ्वीवर रामाच्या कार्यासाठी पाठवला आहे. त्याचे नाव हनुमान! तो तुला लवकरच भेटायला येईल. त्यानंतर तुझा श्रीरामांशी पूर्वीसारखा संपर्क साधला जाईल, पण तू खूप सतर्क रहा. रात्री एक क्षणही झोपू नकोस. इथले अन्न पाणी ग्रहण करू नकोस. तुला अन्नपाण्याची गरज भासणार नाही. कारण तू लंकेत असेपर्यंत मी एक अमृतकुंभ तुझ्या शरीरात प्रवाहित करत आहे. आता रावणाला तुझ्या बुद्धीवर आक्रमण करायची एकही संधी देऊ नकोस. उलट त्याच्याशी आंतरिक युद्ध करून त्याला कमजोर कर. मी सदैव तुझ्याजवळ आहे.’’ सीतामाई आंतरिक लढाईसाठी सज्ज होते.

रावणाने सीतामाईंवर मायावी शक्तीचा प्रयोग केला, पण श्रीराम कृपेने सीतामाईंची बुद्धी, मन व शरीर रामनामाने भरून गेले. तेव्हा सीतामाईंना त्यांचा संकल्प पुन्हा आठवला आणि त्यांची शक्ती परत आली. त्या लंकेत ज्या उद्देशाने आल्या होत्या, त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी त्यांना रावणासमोर दुबळे पडून चालणार नव्हते. त्या आता  धैर्यवान बनल्या. कारण त्यांची शक्ती श्रीरामांशी जोडली गेली होती.

सीतामाईंच्या डोळय़ांसमोरील सगळी दृश्ये नाहीशी होऊन त्या एका विशाल अंतराळात उभ्या आहेत असे त्यांना दिसते. त्यांच्या भोवती सर्व ग्रहमंडळ, सौरमंडळ फिरत असते. त्या वेळी त्यांना रावण अतिशय विकृत स्वरूपात त्यांच्यासमोर उभा दिसतो. त्याच्या हातात एक उल्का असते. उल्का म्हणजे ग्रहाचा एक मोठा तुकडा. रावण सीतामाईंना आव्हान देतो की, ‘‘मी वसुंधरेचा नाश करीन. तू मला अडवू शकणार नाहीस,’’ असे बोलून रावण पृथ्वीच्या दिशेने ती उल्का फेकतो. विजेच्या गतीने सीतामाई रावण आणि पृथ्वी यांच्या मधोमध जाऊन उभी राहते. पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या त्या उल्केला स्वतः मध्ये सामावून घेते.

हे बघताच रावण खूप विचलित होतो. तो समोर येईल त्या ग्रहावर उल्का मारत सुटतो आणि सीतामाई प्रत्येक वेळी त्या ग्रहासमोर येऊन ग्रहाला वाचवतात. रावण म्हणतो, ‘‘मी सूर्याचा प्रकाशच काढून घेईन.’’ सीतामाई म्हणतात, ‘‘मी सूर्याला पुन्हा प्रकाश देईन. आज हे विश्व केवळ प्रेमाच्या शक्तीने उभारले गेले आहे. तुझ्यात असलेली घृणा, मत्सर, क्रोध, काम या वाईट शक्ती या प्रेमाच्या शक्तिपुढे कस्पटासमान आहेत.’’ हे ऐकताच रावण घाबरून पळत सुटतो. सौरमंडळात लपता येईल का, असा विचार करतो. प्रत्येक वेळी सीतामाई त्याच्या समोर येऊन उभी राहते. रावणाच्या मनातली प्रत्येक गोष्टीचा विनाश करण्याची वृत्ती कमी होत नाही.

ते बघून सीतामाई विचार करतात की, एवढी घृणा याच्या मनात कुठून आली. मी याची काय मदत करू शकते, ज्यामुळे याची ही घृणा कमी होईल. सीतेसारख्या जगन्मातेचे मन हे प्रत्येक लेकराचे भले व्हावे अशी इच्छा धरून असते. तेव्हा त्यांना रावणाचा गतजन्म दिसतो. ज्यात रावण हिरण्यकश्यपू या रूपात असतो. त्याला त्याच्या मुलगा प्रल्हादबद्दल प्रेम असते पण नारायणाबद्दल द्वेष असतो. म्हणून तो मुलाला वारंवार मारण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रल्हाद ‘नारायण नारायण’ असा सतत जप करत असतो. प्रत्येक वेळी मुलाला मारताना त्याच्यातल्या बापाला त्रास होतो, पण मी नारायणापेक्षा श्रेष्ठ आहे हा अहंकार मुलावरचे प्रेम मारून टाकत असते.

याला नारायणाबद्दल एवढा द्वेष का? सीतामाईं विचार करतात. तेव्हा त्यांना त्या स्वतः वैकुंठात महालक्ष्मी रूपात आणि श्रीराम नारायणाच्या रूपात दिसतात. नारायण महालक्ष्मीला सांगत असतात, ‘‘आज ब्रह्माचे चार पुत्र सनकादिक ऋषी कुमार रूपात आपल्याला भेटायला आले होते.’’ मग महालक्ष्मी विचारते, ‘‘मग आपल्याला ते भेटले का नाहीत?’’ नारायण सांगतात की, ‘‘द्वारपाल जयने त्यांना आत येऊ दिले नाही. त्यांना सांगितले की, नारायण आणि महालक्ष्मी विश्रांती घेत आहेत व आता त्यांना भेटता येणार नाही, पण खरी गोष्ट वेगळी आहे. जयला अहंकार आहे की, त्याच्या एवढे प्रेम आपल्यावर कोणी करू शकत नाही. आज त्या चार कुमारांच्या डोळ्यांतील प्रेम बघून त्याला मत्सर वाटला. म्हणून त्याने हे असे केले.’’ महालक्ष्मीला वाईट वाटते.

नारायण व महालक्ष्मी चार कुमारांना जाऊन भेटतात. ते कुमार जयबद्दल तक्रार करत नाहीत. कारण ते उच्च प्रतिचे योगी असतात. नंतर नारायण जयला बोलावून त्याने असे का केले हे विचारतात. जय असत्य सांगतो की, ‘‘हे कुमार खूप दुष्ट आहेत आणि ते माझ्याशी वाईट वागले म्हणून मी त्यांना घालवून दिले.’’ एकामागोमाग वाईट वृत्ती वाढताना दिसते. प्रथम अहंकार, मग मत्सर आणि आता असत्य. अहंकार हा सर्व दुर्गुणांचा स्रोत आहे. आपणही हे मी केले, हे मला मिळाले असे म्हणण्यापेक्षा हे परमेश्वराने माझ्याकडून करून घेतले, हे परमेश्वर कृपेने मला मिळाले असे म्हटले तर आपल्यात अहंकार येत नाही.

नारायण जयला सल्ला देतात की, “त्याने ताबडतोब ध्यानाला बसून आत्मचिंतन करावं. स्वतःमधील दुर्गुण काढून टाकावेत.’’ परंतु हा सल्ला न ऐकता जय त्या कुमारांकडे जातो आणि त्यांनी नारायणापाशी चुगली केली म्हणून त्यांच्याशी भांडायला लागतो. आता त्याला क्रोध आलेला असतो. ते कुमार उच्चश्रेणीचे योगी असल्याने त्यांना न सांगता नारायणाने जयला केलेला उपदेश कळतो. त्यामुळे ते जयवर चिडत नाहीत. त्यातील एक कुमार जयला एक साधना सांगतो, ज्यामुळे त्याला ध्यानात जाऊन आत्मचिंतन करायला मदत होईल, पण जयला अजूनच राग येतो. त्याला वाटते की, हे कुमार मला मुद्दाम अपमानास्पद बोलत आहेत. जय ठरवतो की, मी या अपमानाचा बदला घेणारच.

एक दिव्य स्त्री या कुमारांसाठी फळे घेऊन जाताना जय पाहतो. जय ते फळ त्या स्त्रीला मागतो, पण ती नाही म्हणते. तिच्याजवळ जात जय बळजबरीने तिची फळाची टोपली खेचून घेतो. त्या वेळी त्याची दृष्टी त्या स्त्रीवर पडते. त्याची कामुक दृष्टी पाहून त्या स्त्रीला अपमानास्पद वाटते. कारण वैकुंठात अशा प्रकारे स्त्रीचा अपमान होत नसतो. त्या स्त्रीचे दुःख पाहून महालक्ष्मी तिथे प्रगटते. ती जयला ताबडतोब ध्यानात जायला सांगते. जय त्याकडे दुर्लक्ष करतो. आता मात्र ते कुमार रागावतात. एक तर स्त्रीकडे बघायची वाईट नजर आणि प्रत्यक्ष महालक्ष्मीचा अपमान. ते जयला शाप देतात की, त्याला सात जन्म पृथ्वीवर घ्यावे लागतील. तिथे नारायण प्रगटतात. जयची बुद्धी ठिकाणावर येते. तो नारायण व महालक्ष्मीची माफी मागतो आणि ध्यानाला जायला तयार होतो. नारायण जयला सांगतात की, “आता उशीर झाला आहे. मी फक्त शापाचा कालावधी कमी करू शकतो. सातच्या ऐवजी तुला तीन जन्म घ्यावे लागतील.’’ तो महालक्ष्मीकडे आशेने बघतो. ती जगन्माता दुःखाने जयकडे बघते आणि त्याला सांगते की, “पृथ्वीवर जाऊन लगेच ध्यानाला बस. महादेवाची भक्ती करून तुझ्यातील दुर्गुणांचा नाश कर. जर तू हे करू शकला नाहीस तर मला आणि नारायणाला पृथ्वीवर जन्म घेऊन तुझ्याशी युद्ध करावे लागेल. जे अतिशय भयंकर असेल ज्याचा सर्व जगावर परिणाम होईल.’’ महालक्ष्मीला जय खूप दूरवर जाताना दिसतो.

हे सर्व प्रसंगदृश्ये सीतेला दिसत असताना रावण सौरमंडळात घाबरून पळत असतो. त्या वेळी सीतामाईला गाणे ऐकू येते. जे तिला  खूप ओळखीचे वाटते. ते नारायण महालक्ष्मीची स्तुती असते. ही स्तुती जय नेहमी म्हणत असे. रावणाला स्तुती ऐकू येते. तो ती लक्षपूर्वक ऐकू लागतो.  कारण त्याच्याही ती ओळखीचे असते. त्याला त्याच्या मागच्या जन्माचा हिरण्यकश्यपूचा भास होतो. ही स्तुती प्रल्हाद नेहमी म्हणायचा. एका क्षणापुरता रावणाच्या बुद्धीत वाईट विचार येत नाहीत, त्या क्षणी सीतामाई रावणाच्या बुद्धीत प्रवेश करते.

आता सीतामाईंच्या समोरची दृश्ये बदलतात. असंख्य  योगिनी तिच्या आजबाजूला दिसतात. त्यात अनुसूया माता असते जिने सीतामाईला आपल्या ध्यानाचे फळ दिलेले होते. माता लोपामुद्रा असते जिने सीतामाईला स्वसंरक्षणासाठी अनेक मुद्रा व मंत्र शिकवलेले होते. माता गार्गी असते जिने सीतामाईला मिथिलेत असताना शास्त्र शिकवले होते. माता देवहुती व तिच्या सर्व कन्या सीतामाईंचे तिच्या धैर्याबद्दल अभिनंदन करतात. माता पार्वती सीतामाई समोर प्रगट होते. माता पार्वती म्हणते, “पुत्री तू खूप सहन केलं आहेस. तुझ्यामुळे असंख्य पीडित स्त्रियांना शांती मिळाली आहे. श्रीराम लवकरच इथे येऊन रावणाचा नाश करतील.’’ सीतामाई विचारते, “माता माझा श्रीरामांशी संपर्क कधी पुन्हा प्रस्थापित होईल?’’ यावर पार्वतीमाता म्हणते, “महादेवाने त्याचा एक अंश पृथ्वीवर रामाच्या कार्यासाठी पाठवला आहे. त्याचे नाव हनुमान. तो तुला लवकरच भेटायला येईल. त्यानंतर तुझा श्रीरामांशी संपर्क पूर्वीप्रमाणे साधला जाईल, पण तुला खूप सतर्क रहावे लागणार आहे. तू रात्री एक क्षणही झोपू नकोस. इथले अन्न व पाणी ग्रहण करू नकोस. तुला अन्नपाण्याची गरज भासणार नाही. कारण तू लंकेत असेपर्यंत मी एक अमृतकुंभ तुझ्या शरीरात प्रवाहित करत आहे. आता रावणाला तुझ्या बुद्धीवर आक्रमण करायची एकही संधी देऊ नकोस. उलट त्याच्याशी आंतरिक युद्ध करून त्याला कमजोर करायचे आहे. मी नेहमी तुझ्या जवळच आहे. असे म्हणून पार्वतीमाता एका लहान पांढऱ्या पक्ष्याचे रूप घेऊन अशोकवृक्षाच्या फांदीवर जाऊन बसते.

सीतामाई ध्यानातून बाहेर येत डोळे उघडतात. त्यांना आजूबाजूला पहारा देणाऱ्या राक्षसिणी दिसतात. त्यातली एक पुढे येते आणि सीतामाईला म्हणते, “तुम्हाला जागे पाहून मला खूप आनंद झाला आहे.’’ सीतामाई विचारतात, “मी किती वेळ ध्यानात होते.’’ ती राक्षसीण म्हणते, “कित्येक आठवडे आपण ध्यानात होता. तुमच्या भोवती एक दिव्य रिंगण होते. त्यामुळे कोणीही तुमच्यापर्यंत येऊ शकत नव्हते.’’ सीतामाई ध्यानातून बाहेर आल्याची  बातमी रावणापर्यंत पोहोचते.

[email protected]