बोईसरमध्ये तीन मुलांचा बुडून मृत्यू; भरावासाठी खोदलेला खड्डा ठरला काळ

sunk_drawn

बोईसर काटकर गावाच्या हद्दीतील हनुमाननगर येथे बिल्डरने इमारतीचा भराव करण्यासाठी बेकायदेशीर खोदलेल्या खड्ड्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. बिल्डरच्या बेफिकिरीमुळे इमारतीच्या भरावासाठी खोदलेला खड्डा मुलांसाठी काळ ठरला. सूरज यादव (६) धीरज यादव (१२) या दोघा सख्ख्या भावांसह अंकित गुप्ता (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत.

गणेशनगर येथे राहणारी चार मुले हनुमानगर येथे आज दुपारी खेळायला गेली होती. खेळत असताना तोल जाऊन ती खड्यात पडली. खड्डा खोल असल्याने मुले बुडाली. यातील एक मुलगा सुदैवाने वाचला. बाहेर येऊन त्याने आरडाओरडा केल्यानंतर नागरिक मदतीला धावले. मात्र तोपर्यंत सूरज, धीरज या सख्ख्या भावांसह अंकित या तिघांचा मृत्यू झाला होता. या तिन्ही मुलांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बिल्डर, ठेकेदारांनी चिमुकल्यांचा जीव घेतला.

बोईसर परिसरात शासकीय वन व आदिवासी खातेदारांच्या बहुतांश जमिनी आहेत. या ठिकाणी बेकायदेशीर खोदकाम कोणी केले व तो खड्डा पावसापूर्वी बुजविण्यात का आला नाही, असा प्रश्न यानिमिताने विचारला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते काही बिल्डरांनी इमारतींचा भराव करण्यासाठी या परिसरात बऱ्याच ठिकाणी खोदकाम केले आहे. याशिवाय रेल्वे कॉरिडॉरसाठी ठेकेदारानेही खोदकाम करून माती चोरून नेली आहे. बेकायदा खोदकाम करणाऱ्या बिल्डर आणि ठेकेदारांनीच मुलांचा जीव घेतला असून संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.