
मुंबई महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून चेंबूरच्या प्रकाशनगर आणि प्रयागनगर येथे सुरू असलेल्या प्रदूषणकारी ‘आरएमसी’ प्लांटमुळे हजारो नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नागरी वस्तीत असलेल्या या प्लांटमुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा प्लांट तातडीने रद्द करावा अशी मागणी शिवसेना, नागरिकांकडून करण्यात आली आहे.
आरोग्याला धोकादायक असणारा प्रभाग क्रमांक 148 मधील अमित इन्फ्रा प्रा. लि. कंपनीचा आरएमसी प्लांट 2017 साली शिवसेनेने बंद पाडला होता. मात्र, आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिल्याचे सांगत मेसर्स गेनॉन नॉर्टन इंजिनीअरिंग या कंपनीने नागरी वस्तीत पुन्हा आरएमसी प्लांट उभारला. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनीही हा प्लांट या ठिकाणी होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. दरम्यान, हा प्लांट तातडीने रद्द करावा, अन्यथा जोरदार आंदोलनाचा इशारा शिवसेनेने मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला आहे.
नियम धाब्यावर
नागरी वस्तीत 500 मीटर अंतराच्या आत असा प्रदूषणकारी, रहिवाशांच्या जिवाला धोका निर्माण करणारा प्लांट उभारता येत नाही. तरीही पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम धाब्यावर बसवून आरएमसी प्लांट उभारला आहे. त्यामुळे याची परवानगी तत्काळ रद्द करून हा प्लांट रद्द करावा, अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख प्रमोद शिंदे, माजी नगरसेविका निधी शिंदे, दक्षता पाताडे यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.
आधी जनसुनावणी घ्या!
हा संपूर्ण परिसर हा नागरी वस्तीचा आहे. त्यामुळे इथे प्लांट उभारला तर त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतील. याबाबत रहिवाशांची भूमिका समजून घेण्यासाठी जनसुनावणी घ्यावी अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.