
जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहवून डोळे पाणवतात. दुष्काळ, अवकाळी यांच्याशी मुकाबला करत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर आता स्वतःलाच औताला जुंपण्याची वेळ आली आहे. सोयाबीन, कपाशीसाठी आंतरमशागत करण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्वतः औताला जुंपन्याची वेळ हडोळती (ता.अहमदपुर) येथील पंचाहतरीत असलेल्या अंबादास गोविंद पवार या शेतकऱ्यावर ओढवली आहे.
अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील अंबादास (वय 73) यांची 2 एकर 9 गुंटे जमीन असून भुमरट साधारण जमीन आहे. या जमीनीवरच त्यांची उपजिविका चालते. पत्नी मुक्ताबाई पवार याच्यासह ते शेतीतील कामे करतात. त्यांचा एक मुलगा पुण्याला कामाला असतो. घरात असलेल्या सून, एक नातू व एक नात यांचा शिक्षणाचा खर्च आणि इतर घरखर्च शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे उधार-उसनवारी करुन ते शएती करतात. शेतीची पेरणी केल्यानंतर लागवड केलेल्या कपाशिच्या पिकात कोळपणी करण्यासाठी पैशांची तजवीज झाली नाही. त्यांच्याकडे बैल बारदानाही नाही. बैलाची दिवसाकाठी 2500 रूपये एवढी महागडी रोजदांरी त्यांना परवडणारी नाही. त्यामुळे पंचाहतरी गाठलेल्या अंबादास पवार यांनी स्वतःला औताला जुंपून घेण्याची वेळ आली आहे. स्वतःला औताला जुंपून घेत ते पत्नी मुक्ताबाई यांच्यासह कोळपणीची कामे करत आहेत.
सरकार विरोधात शेतकऱ्यात रोष
खुर्चीवर बसलेले राज्यकर्त आश्वासनाची खैरात करतात. आम्ही कर्जमाफी करू , शेतीमालाला हमी भाव देऊ , शेतकऱ्याला रेशन मोफत देऊ , असे सांगतात परंतू सध्याची परिस्थिती पाहता सरकारच्या घोषणा फोल ठरल्याचे दिसते. सरकार कितीही घोषणा करत असले तरी शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. दोन एकरमध्ये 20,000 रूपये कर्ज काढून पेरणी केली आहे. एकत्रित कुंटूबात विहीर आहे पण पाणी नाही. सहकार सोसायटीचे 40000 रुपये कर्ज असून शासनाने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन फोल ठरले आहे.
निसर्गाची साथ नाही की शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. सरकारने वाढवलेले खताचे भाव , त्यामुळे उत्पादन कमी आणि खर्च अधिक आशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारच्या धोरणामुळे आणि वाढलेल्या खर्चामुळे शेती परवडेनाशी झाली आहे, असे मुक्ताबाई पवार यांनी सांगितले.