जगन्नाथ रथयात्रेत चेंगराचेंगरी, तिघांचा मृत्यू; 50 जखमी

ओदिशातील पुरी येथे जगन्नाथ यात्रेदरम्यान मोठा अपघात झाला. जगन्नाथाच्या रथाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी प्रचंड वाढल्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला. तर 50 भाविक जखमी झाले. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास गुंडीचा मंदिरासमोर भगवान जगन्नाथाच्या नंदीघोष रथाजवळ ही घटना घडली.

बसंती साहू (36) आणि प्रेम कांती मोहंती (78) आणि प्रभात दास अशी मृतांची नावे असून सर्व मृतदेह पुरी वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले आहेत. भगवान जगन्नाथांचा रथ पाहण्यासाठी गर्दी वाढल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. अनेक जण खाली पडले. त्यांना अक्षरशः तुडवत भाविकांनी रथाच्या दिशेने धाव घेतली. त्यामुळे अनेक जण चिरडले गेले. त्यातच तिघांचा मृत्यू झाला, तर तब्बल 50 जण जखमी झाले.

मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची भरपाई

चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून आपले सरकार सुरक्षेत कमी पडल्याची कबुली देत भाविकांची माफी मागितली आहे. तसेच दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. सुरक्षेत दिरंगाई अक्षम्य अपराध असून दोषी अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही माझी यांनी दिले असून जिल्हाधिकारी सिद्धार्थ शंकर स्वैन आणि पोलीस अधीक्षक विनीत अग्रवाल यांच्या बदलीचेही आदेश दिले आहेत. सामान्य प्रशासन विभागाला नोटीसही बजावण्यात आली आहे.

शुक्रवारी 600 भाविक गुदमरले

भगवान जगन्नाथांचा रथ गुंडीचा मंदिरात पोहोचला. दरम्यान, शुक्रवारी देवी सुभद्रा रथाभोवती प्रचंड गर्दी वाढल्याने तब्बल 625 भाविकांची प्रकृती बिघडली. गर्दी इतकी वाढली की मुंगी शिरायलाही जागा नव्हती. त्यामुळे भाविक अक्षरशः गुदरमले. 70 जणांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 9 भाविकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पुरेसे पोलीस, सुरक्षा दल तैनात नव्हते

चेंगराचेंगरी झाली त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आली नव्हती. पुरेसे पोलीस बळ आणि सुरक्षा दलाचे जवानही मोठय़ा संख्येने तैनात नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचे नियोजन करता आले नाही आणि चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे सांगितले जात आहे.