
हिंदुस्थान हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. हे सरकार कष्टकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे असल्याचा डांगोराही राज्यातील भाजप सरकार सतत करते. पण मुंबईपासून जवळ असलेल्या जव्हारमधील धिवंडा या गावात राहणाऱ्या आदिवासींना शेती करण्यासाठी चक्क वाघ नदीतून रोज ‘टायर-ट्यूब ‘ने प्रवास करावा लागत आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून ऐन पावसाळ्यात बळीराजाला नदी ओलांडावी लागत आहे. पूल नसल्याने आदिवासींवर ही वेळ आली असून कृषीमंत्री, हे पहा जव्हारच्या धिवंडा गावातील धक्कादायक वास्तव.
जव्हार तालुक्याच्या धिवंडा या गावातील वाघ नदी सध्या ओसंडून वाहत आहे. या गावात खोरीपाडा, बोंडारपाडा, शिवाचा पाडा, बोरीचा पाडा तसेच हातेरी हे आदिवासीबहुल गाव-पाडे आहेत. येथे एकूण 52 कुटुंबे राहतात. शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन असून नदीच्या पलीकडे मोखाडा तालुक्याच्या हद्दीत या सर्वांची शेती आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने रोजच शेतकऱ्यांना तेथे जावे लागते. मात्र नदीवर पूल नसल्याने तसेच अन्य कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने आदिवासींना ‘टायर ट्यूब’वर बसून शेतात जावे लागते.
वाघ नदीचे पात्र खूप मोठे असून होडीदेखील उपलब्ध नाही. त्यामुळे ट्यूबवर बसून जीव धोक्यात घालत शेती करण्यासाठी रोज ग्रामस्थांना जावे लागत आहे.
वाघ नदीवर पूल बांधावा अशी आदिवासींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण सरकारने सपशेल दुर्लक्ष केले असून आणखी किती दिवस रामभरोसे प्रवास करायचा, असा सवाल विचारण्यात येत आहे.
गेल्या वर्षी हीच नदी पार करीत असताना विष्णू फुकाणे हा शेतकरी वाहून गेला होता. तरीदेखील सरकारला अद्यापि जाग आलेली नाही.
वाघ नदीवर पूल व्हावा यासाठी माजी सरपंच शिवराम बुधर यांनी बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तोंडी व लेखी मागणी केली होती. मी स्वतः ग्रामस्थांच्या वतीने स्थानिक लोकप्रतिनिधींनादेखील पूल होण्यासाठी आग्रह धरला आहे. पण अजून त्याकडे लक्ष दिलेले नाही.
रेखा फुकाणे (सरपंच)