स्वप्नातील ‘मज्जा’ बिघडेल, झोप उडेल, रात्री जेवताना पनीर, मिठाई आणि आईस्क्रीम खाऊ नका

रात्रीच्या वेळी भरपेट जेवण्याची, अरबट-चरबट खाण्याची, जेवणानंतर गोड खाण्याची अनेकांना सवय असते. तुम्हालाही ही सवय असेल तर आताच मोडा! कारण रात्री जेवताना पनीर, आइस्क्रीम व मिठाई खाणे घातक ठरते. अशा सवयीमुळे झोपेचे खोबरे होतेच, पण स्वप्नांची मज्जाही बिघडते, असे एका अभ्यास पाहणीतून समोर आले आहे.

कॅनडातील मॉन्ट्रियल विद्यापीठाच्या टीमने एक हजार विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या खाण्याच्या सवयींचा व त्यामुळे आरोग्यावर होणाऱया परिणामांचा अभ्यास केला. त्यानुसार रात्रीच्या वेळी खालेल्ली मिठाई, दुग्धजन्य किंवा मसालेदार पदार्थ खाणाऱयांची झोप उडाल्याचे समोर आले. दुग्धजन्य पदार्थांची अॅलर्जी असलेल्या लोकांना वाईट स्वप्ने पडतात. असे लोक जेव्हा डेअरी उत्पादनांचे सेवन करतात तेव्हा त्यांना पोटदुखी, गॅसचा त्रास होतो. झोप नीट लागत नाही. अभ्यास पाहणीचा अहवाल फ्रंटियर्स इन सायकाॅलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. त्यानुसार वाईट स्वप्न पडण्यासाठी मिठाई कारणीभूत असल्याचे 31 टक्के लोकांनी सांगितले. तर 22 टक्के लोकांनी दुग्धजन्य पदार्थांना, 16 टक्के लोकांनी मांसाहाराला व 13 टक्के लोकांनी तिखट खाण्याला दोष दिला. त्यातही सर्वात जास्त दुष्परिणाम पनीरमुळे होतो असे समोर आले.

मिठाई खा किंवा फळे, परिणाम होतोच! – डॉ. नुपूर कृष्णन

मुंबईतील आहार व पोषण तज्ञ डॉ. नुपूर कृष्णन यांनी ‘सामना’शी बोलताना या अभ्यास पाहणीवर प्रतिक्रिया दिली. ‘रात्रीच्या वेळी साखरयुक्त पदार्थ खाल्ले की ते परिणाम नक्कीच करतात. मग ती मिठाई असो किंवा फळे. त्या पदार्थातील साखरेच्या प्रमाणात शरीरातील ग्लायसेमिक लोड वाढतो. त्यामुळे अस्वस्थ वाटते. त्याचा झोपेवर परिणाम होतो. झोप उडाली की माणूस बेचैन होतो व त्याच्या मनात नको ते विचार येत राहतात. वैज्ञानिक दृष्टीने आपल्याला त्याकडं पाहावं लागेल, असे त्या म्हणाल्या.

रात्री काय खाणे चांगले?

अहवालानुसार, जे लोक नियमित फळे खातात, त्यांनी झोप चांगली येत असल्याचे सांगितले. भाज्या आणि हर्बल टी प्यायल्यामुळेसुद्धा निद्रानाशाचा त्रास कमी झाल्याचे व स्वप्नेही सकारात्मक येत असल्याचे लोकांनी सांगितले.