हे जनसुरक्षा नव्हे, भाजप सुरक्षा विधेयक! उद्धव ठाकरे यांची चपराक

महायुती सरकारने पाशवी बहुमताच्या जोरावर विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर करून घेतले. पण विधान परिषदेत विरोधी पक्षाने त्याला जोरदार विरोध केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सरकारने आणलेल्या विधेयकाला शेंडा-बुडखा काहीच नसून त्यात देशविघातक कृत्य करणारे, देशद्रोही, नक्षलवादी अशा शब्दांचा उल्लेख करा आणि पुन्हा विधेयक आणा तरच पाठिंबा देऊ, अशी सडेतोड भूमिका आज मांडली. या विधेयकाचे नाव जनसुरक्षा ठेवले असले तरी हे विधेयक भाजपासुरक्षा विधेयक आहे. कारण कोणत्याही जनाला कोणत्याही आरोपाखाली सरकार या कायद्यान्वये तुरुंगात टाकू शकते, असा सावधगिरीचा इशाराही उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला.

विधेयकात फक्त ‘कडव्या डाव्या’ विचारसरणीच्या संघटना असा उल्लेख आहे. आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला आहे. कडव्या डाव्या हा शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. तो डाव्या विचारसरणीचा की उजव्या विचारसरणीचा दहशतवाद होता? ते दहशतवादी अजूनही पकडले जात नाहीत. जो दहशतवादी, नक्षलवादी असेल त्याचा जात-पात-धर्म न पाहता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे. पण या विधेयकात या दोन्हींचा कुठे उल्लेखच नाही.

उद्धव ठाकरे यांनी आज विधान भवन आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनसुरक्षा विधेयकाला विधान परिषदेत शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केल्याचे सांगितले. पूर्वी मिसा आणि टाडा कायदा होता. त्याचाही दुरुपयोग केला गेला होता. तसाच दुरुपयोग जनसुरक्षा कायद्याचाही होऊ शकतो, अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली.

सरकारच्या कथनी व करणीत फरक आहे. दहशतवादाचा बीमोड करायचाय, नक्षलवादाचा बीमोड करायचाय असे सांगताहेत, पण या विधेयकात कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाही, याकडे उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, डावी आणि उजवी विचारसरणी म्हणजे काय हे आधी समजून घ्यायला हवे. शिवसेना आणि भाजपामध्ये शिवसेनेला उजव्या विचारसणीचे म्हटले जाते म्हणजे शिवसेना धर्म मानणारी आहे. खरंतर डावे व उजवे करण्याची गरजच नाही. संविधानाच्या प्रस्तावनेत सर्वसमावेशक असे लिहिलेले आहे. समानता, सामाजिक न्याय, व्यक्तिस्वातंत्र्य याचा उल्लेख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा सब का साथ सब का विकास असा नारा दिला, मग ती डावी की उजवी विचारसरणी आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

जनसुरक्षा कायदा कुणासाठी आणताय

दहशतवाद्यांचा, नक्षलवाद्यांचा सामना आपल्या अतुलनीय शौर्याने महाराष्ट्र पोलिसांनी केला. सीआरपीएफने आणि नागरिकांनी केला. देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलेय की, देशातला नक्षलवाद संपवून टाकू. मग कायदा नसतानादेखील नक्षलवाद संपेपर्यंत आणला असताना जनसुरक्षा कायदा कोणासाठी आणताय, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

विधेयकाला राजकीय हेतूचा वास

देशविघातक शक्तींचा बीमोड करायचा असेल तर महाविकास आघाडी सोबत होती, असेल आणि राहील. पण राजकीय हेतूने प्रेरीत होऊन हे विधेयक सरकार आणतेय असा वास येतोय. कारण त्यात नक्षलवाद हा शब्दच नाही. बेकायदेशीर कृत्याच्या नावाखाली सरकार सर्वसामान्य जनतेलाही कधीही, कुठेही उचलू शकते आणि तुरुंगात टाकू शकते, असे ते म्हणाले.