तीन वर्षे गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ, कोर्टाकडून पोलिसाच्या चौकशीचे आदेश

महानगर दंडाधिकारी यांनी आदेश देऊनही गेली तीन वर्षे गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या पोलिसाची चौकशी करण्याचे निर्देश न्यायालयाने रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

विवेक अहिरे असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. दापोली पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांनी गुन्हा नोंदवला नाही, असा आरोप आहे. आता ते खेड पोलिसांत आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अहिरे यांना कारणे द्या नोटीस धाडावी. दंडाधिकारी यांच्या आदेशाचे पालन का केले नाही याचे समाधानकारक उत्तर अहिरे यांनी न दिल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा, असे आदेश खंडपीठाने अधीक्षकांना दिले आहेत.

दंडाधिकारी यांचे गुन्हा नोंदवण्याचे आदेश असतानाही पोलीस निरीक्षक अहिरे यांनी गुन्हा नोंदवला नाही ही धक्कादायक बाब असल्याचे निरीक्षण न्या. रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांनी नोंदवले.

काय आहे प्रकरण 

मिलिंद मुंडेकर यांनी ही याचिका केली होती. ऑगस्ट 2023 मध्ये मुंडेकर यांनी प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालयात एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी खासगी तक्रार केली होती. न्यायालयाने याची चौकशी करून आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक अहिरे यांनी गुन्हा नोंदवला नाही. जिल्हा परिषदेच्या प्रमुखांकडे हे प्रकरण प्रलंबित असल्याची सबब अहिरे यांनी दिली. अखेर मुंडेकर यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. त्यानंतर याचा गुन्हा दाखल केला. यावर न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त केला.

जलद गतीने तपास करा

गुह्याचा जलद गतीने व योग्य प्रकारे तपास करा, असे न्यायालयाने दापोली पोलिसांना बजावले आहे. तपासात दिरंगाई होत असल्याचे जाणवल्यास मुंडेकर यांनी अर्ज करावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.