
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी महिला वर्ल्डकपचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी मैदान उपलब्ध नसल्याने बंगळुरू ऐवजी नवी मुंबईची निवड करण्यात आली आहे. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर अंतिम लढतीसह पाच सामने होणार आहेत. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि महाराष्ट्रातील क्रीडा प्रेमींना एक प्रकारे लॉटरीच लागली आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर लीग स्टेजचे तीन सामने, उपांत्य फेरीचा एक सामना आणि अंतिम सामना खेळला जाईल. 2 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाईल. आयसीसीने लढतींचे ठिकाण बदलले असले तरी तारखा मात्र कायम असणार आहेत. त्यानुसार 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर दरम्यान हा वर्ल्डकप खेळला जाईल. नवी मुंबईसह गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि कोलंबोतील मैदानावर सर्व सामने होतील.
नवी मुंबईत झालेल्या महिला क्रिकेट लढतींना गेल्या काही काळात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ही महिला क्रिकेटसाठी चांगली बाबत असून आंतरराष्ट्रीय सामने आणि डब्ल्यूपीएल दरम्यान येथे प्रेक्षकांना दिलेला पाठिंबा उल्लेखनीय आहे. त्यामुळे खेळाडूंना प्रेरणा देणारे वातावरण येथे तयार होत असून मला खात्री आहे की 12 वर्षानंतर हिंदुस्थानात होणाऱ्या महिला विश्वचषकातील सामनेही यात उत्साहाने होतील, असे आयसीसीचे अध्यक्ष जय शहा म्हणाले.
View this post on Instagram
दरम्यान, स्पर्धेचा अंतिम सामना 2 नोव्हेंबर रोजी कोलंबो किंवा नवी मुंबई येथे होईल. पहिला उपांत्य सामना 29 ऑक्टोबरला गुवाहाटी किंवा कोलंबो येथे, तर दुसरा उपांत्य सामना 30 ऑक्टोबरला नवी मुंबईत खेळवला जाईल. हिंदुस्थान 30 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.