कर्मचाऱ्यांना 20 वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छानिवृत्ती

केंद्रीय निवृत्तीवेतन व निवृत्त कर्मचारी कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत एकीकृत पेन्शन योजना अंमलबजावणी) नियम, 2025 अधिसूचित केले. या नियमांनुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत (एनपीएस) एकीकृत पेन्शन योजना (यूपीएस) स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना 20 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच व्हीआरएस घेण्याची मुभा मिळेल. मात्र 25 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतरच संपूर्ण पेन्शन मिळणार आहे. कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व पेन्शन मंत्रालयानुसार, संपूर्ण पेन्शन (अश्युअर्ड पेआऊट) मात्र 25 वर्षांची पात्र सेवा पूर्ण केल्यानंतरच मिळणार आहे. संपूर्ण पेन्शन याचा अर्थ कर्मचाऱ्याच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सेवेतील सरासरी मासिक वेतनाच्या 50 टक्के एवढी पेन्शन होय. 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतल्यास पेन्शन लाभ प्रमाणानुसार (प्रो-राटा) दिला जाईल.