हे अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण; सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाईनंतर अरविंद केजरीवाल संतापले

केंद्रीय गृह मंत्रालयाने सामाजिक कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांच्या संस्थेचा स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख (SECMOL) चा परवाना रद्द केला आहे. त्यांच्या संस्थेत परदेशी गुंतवणूक आली असून ते परदेशी अंशदान कायद्याचे उल्लंघन असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. लेहमध्ये बुधवारी लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. लेहमधील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आणि ४० पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे ८० जण जखमी झाले. या कावाईवर आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया एक्समध्ये पोस्ट केली आहे. त्यांत त्यांनी म्हटले आहे की, सोनम वांगचुक देशाबद्दल विचार करणारे, शिक्षणाबद्दल विचार करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. अत्यंत निकृष्ट आणि खालच्या दर्जाच्या राजकारणामुळे ते केंद्र सरकारच्या यंत्रणेकडून त्रास सहन करत आहेत. हे खूप दुःखद आहे. काह लोक देशावर नियंत्रण कसे ठेवू शकतात? अशा परिस्थितीत देश कसा प्रगती करू शकतो? असा सवालही त्यांनी केला आहे.

लडाखमधील हिंसाचारासाठी सोनम वांगचुक यांना थेट जबाबदार धरत, केंद्र सरकारने म्हटले की त्यांच्या उपोषण आणि प्रक्षोभक भाषणांमुळे जमावाला भडकावण्यात आले. जमावाने भाजप आणि सरकारी कार्यालयांवर हल्ला केला, मालमत्ता जाळली आणि ३० हून अधिक पोलिस आणि सीआरपीएफ कर्मचारी जखमी झाले. गृह मंत्रालयाने आरोप केला की वांगचुक यांनी अरब स्प्रिंग आणि नेपाळच्या जनरल-झेड निदर्शनांचा संदर्भ दिल्याने जमावाला भडकावण्यात आले.

या कारवाईनंतर वांगचुक म्हणाले की, ते सार्वजनिक सुरक्षा कायद्याअंतर्गत (पीएसए) अटक करून घेण्यास तयार आहेत. मी जमावाला भडकावले असे सांगणे म्हणणे समस्येच्या मुळाशी जाण्याऐवजी बळीचा बकरा बनवा हे त्यांचे धोरण आहे. त्यामुळे कोणाचेही भले होणार नाही. ते दुसऱ्याला बळीचा बकरा बनवण्यात हुशार असतील, पण ते शहाणे नाहीत, असे मतही वांगचुक यांनी परखडपणे व्यक्त केले आहे.