देश जळतोय आणि तू झोपतोय? परमात्म्याच्या आदेशामुळेच सरन्यायाधीशांवर बूट फेकला; हल्लेखोराचा दावा

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी सुरू असताना एका वकिलाने ‘सनातन का अपमान नही सहेगा हिंदुस्थान’ अशा घोषणा देत सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. राकेश किशोर असे त्या वकिलाचे नाव असून त्यांनी आपण हे सर्व परमात्म्याच्या सांगण्यावरून केल्याचा अजब दावा केला आहे. ANI ला दिलेल्या मुलाखतीत या वकिलाने त्यांनी जे केले त्याचा पश्चाताप नसून आपण कुणाचीही माफी मागणार नसल्याचे म्हटले आहे.

”मी जे काही केलं त्याचा मला जराही प्रायश्चित नाही. मी कुणाचीही माफी मागणार नाही. तुम्ही मला प्रश्न करताय. पण मी काहीही केले नाही ही परमात्माची इच्छा आहे. मी जेलमध्ये जावे, मला फाशी व्हावी ही परमात्याची इच्छा असेल म्हणून मी हे केले. मी आधीच ठरवून कोर्टात गेलो होतो कारण 16 सप्टेंबर नंतर मला झोप येत नव्हती. परमात्मा मला झोपेतून उठवून सांगत होता की देश जळतोय आणि तु झोपतोय? त्यामुळे मी हे केले. मी माझ्या सोबत दोन दिवसांची औषधं घेऊन गेलो होतो. मला वाटलेलं दोन दिवस मला तुरुंगात राहावं लागेल. पण सरन्यायधीशांनी माझ्यावर कारवाई केली नाही. याला मी त्यांचे उपकार मानू की काय मानू ते समजत नाहीए. पोलिसांनी माझी चौकशी झाली. त्यांनी मला जेवण दिलं चहा बिस्किट दिला. त्यासाठी मी त्यांचे उपकार मानतो”, असे राकेश किशोर म्हणाले.

सरन्यायधीश दुसऱ्या देशात जाऊन बोलतात की देश बुलडोझरने चालत नाही. ज्या लोकांविरोधात बुलडोजर चालवला जात आहे त्यांनी सरकारच्या संपत्ती लुटून किती मोठ मोठ्या प्रॉप्रटी उभ्या केल्या होत्या. माझा सरन्यायधीशांना प्रश्न आहे अशा लोकांवर योगीजी जे बुलडोजर चालवतायत ते चुकीचं आहे का? त्यावर तुम्ही स्टे आणला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे मला त्रास झालाय व होत राहिल. हजारो वर्ष आम्ही लोकांचे गुलाम राहिलो. छोट छोट्या धर्माचे लोक आले ते आमच्यावर राज्य करून गेले. आज आमचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे सनातनी लोकांनी शांत राहू नये. ज्याला जे जमतंय ते त्याने करावे, असे देखील ते म्हणाले