राज्यात दोन दिवस वादळी पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट, मुंबईत ‘जोरधार’ सुरूच

राज्यात आठवडाभर उकाडय़ाने नागरिक हैराण झाले असताना पुढील दोन दिवस गडगडाटासह वादळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामध्ये मुंबईसह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. मुंबईतही पावसाने आज सायंकाळी जोरदार बरसून वर्दीच दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱयानुसार पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. मुंबईतही तापमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत तर किमान तापमान 26 अंशांपर्यंत राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही जिह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र विदर्भात कोरडे वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने कळवले आहे. पावसामुळे उकाडय़ाने हैराण झालेल्यांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी शेतकऱयांचे टेन्शन वाढले आहे.