
देशाच्या स्वातंत्र्याला ७८ वर्षे उलटून गेली तरी आदिवासीबहुल तालुका असलेल्या जव्हारमध्ये दरवर्षी भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. पावसाळा संपला तरी जव्हार तालुक्यातील भागडावासीयांच्या नशिबी अजूनही खड्ड्यातील पाणी असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या गावात ग्रामपंचायतीने बांधलेली विहीर तीन वेळा दुरुस्त करण्यात आली. तरीदेखील या विहिरीला थेंबभरदेखील पाणी आले नाही. त्यामुळे येथील माता, भगिनींना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. तसेच नाईलाजाने खड्ड्यातील पाणीदेखील वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.
जव्हारपासून २० किलोमीटर अंतरावर भागडा गाव असून दरवर्षी पाण्याचा प्रश्न स्थानिकांना भेडसावतो. काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने विहीर बांधली. पण त्याची लवकरच वाट ल ागली. निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे विहिरीची दैन्यावस्था झाली. त्यामुळे एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल तीन वेळा त्याची दुरुस्ती करावी लागली. या दुरुस्तीवरसुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यात आला. पण तरीही या विहिरीला पाणी लागले नाही. त्यामुळे या गावातील लहान मुले व महिला खड्ड्यातीलच पाणी रोज घरी आणत आहेत.
सरकारी पैशातून भागडा गावात विहीर बांधली. पण ठेकेदाराने मनमानीपणे काम केले. थोड्याच दिवसात विहीर खराब झाली. ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या गावातील निकृष्ट विहिरीबाबत माझ्याकडे तक्रार आली असून यासंदर्भात संबंधित विभागाला योग्य ते आदेश दिले आहेत, असे गटविकास अधिकारी डी. एस. चित्ते यांनी सांगितले.
ठिय्या आंदोलनाचा इशारा
तब्बल तीन वेळा विहिरीची डागडुजी करूनसुद्धा पाण्याचा ठिपूसही न आल्याने स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या ढिसाळ कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भागडावासीयांनी दिला आहे.




























































