बदलापूरचे महाबळेश्वर झाले; मुंबईतही कडाका, 11 वर्षांतील नीच्चांकी तापमानाची नोंद

मुंबईचा पारा 11 वर्षांतील नीच्चांक गाठत 11 अंशावर आला तर बदलापूरमध्ये 11 अंश सेल्सिअसवर पारा घसरल्याने महाबळेश्वर झाले आहे. मुंबईमध्ये आज गेल्या अकरा वर्षांतील नीच्चांकी म्हणजे 16.2 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. त्यामुळे मुंबईकर आज दिवसाढवळ्या स्वेटर, मफलरसह घराबाहेर पडल्याचे चित्र दिसत होते.

मुंबईमध्ये या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र आता खऱया अर्थाने थंडीला सुरुवात झाली आहे. केवळ मुंबईच नाही तर राज्याच्या कानाकोपऱयामध्येही थंडीने मुक्काम ठोकला आहे. मुंबईत आज सांताक्रुझ येथे 16.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथे 21.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेल्याची माहिती मुंबईच्या हवामान खात्याकडून देण्यात आली. उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयांमुळे तापमानात घट झाली आहे. परिणामी थंडी वाढली आहे. मुंबईत आज गेल्या 11 वर्षांतील कमी तापमानाची नोंद झाली आहे. पण शुक्रवारपासून पूर्वेकडून येणाऱया वाऱयांमुळे हळूहळू थंडीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि तापमानातील पारा वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई हवामान खात्याच्या सुषमा नायर यांनी दिली.

गेल्या 11 वर्षांची पाऱ्याची नोंद

2025      16.2

2024      16.5

2023      19.7

2022      17.0

2021       19.8

2020      19.2

2019       20.5

2018       19.2

2017       18.0

2016       16.3

2015       18.2

पुणे गारठले; सर्वात कमी तापमानाची नोंद

राज्यभरात थंडीने हुडहुडी भरली असाताना पुण्यात तापमान राज्यातील सर्वात कमी म्हणजे 9.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने पुणे गारठले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत होती. मात्र आता पारा आणखी खाली घसरला आहे. लोणी काळभोर येथे 6.9 अंश सेल्सिअस म्हणजे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे.