
ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्याच्या वेढय़ातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही मावळ्यांसह किल्ले विशाळगड गाठला. त्या थरारक रणसंग्रामाचा अनुभव घेण्यासाठी येथील एनसीसी गट मुख्यालय यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आजपासून दि. 25 ते 4 डिसेंबरपर्यंत पन्हाळा ते विशाळगड या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहिमेला सुरुवात झाली. महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल विवेक त्यागी यांनी या मोहिमेस झेंडा दाखवून प्रारंभ केला.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यागी म्हणाले, मानवी जीवनातील उद्दिष्ट हे स्वयं शिस्तीद्वारे साध्य करता येते. या ट्रकमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सावधानता व सुरक्षा बाळगून ही मोहीम पूर्ण करायची आहे. एनसीसीमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि राष्ट्रीय सेवा मूल्यांना प्राधान्य असते. या बाबी विद्यार्थ्यांनी कधीही नजरेआड करू नयेत. अशा मोहिमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीचे अदान-प्रदान होते. एकोप्याची, समानतेची भावना वाढीस लागते.
यावेळी ज्युनिअर अंडर ऑफिसर प्रियदर्शनी नाईक हिने इंग्रजी, तर सीनियर अंडर ऑफिसर आर्नी पटेल या विद्यार्थिनीने हिंदीमधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, पन्हाळा-विशालगड येथील समरप्रसंग आणि एनसीसी मुख्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश सांगितला.
या मोहिमेत दिल्ली व गुजरात राज्यातील सुमारे 265 कॅडेट सहभागी झाले असून, टप्प्याटप्प्याने 12 राज्यांतील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या ट्रक मोहिमेत मुलींची एक स्वतंत्र तुकडी राहणार आहे. यावेळी ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, कर्नल (डेप्युटी) अनुप रामचंद्रन, ट्रेनिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई, 5 महाराष्ट्र बटालियन (कोल्हापूर) कमांडिंग ऑफिसर कर्नल मानस दीक्षित यांच्यासह मुख्यालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.





























































