कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ांची रखडपट्टी; तेजस एक्प्रेसचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रवाशांचे हाल

‘थर्टी फर्स्ट’चे सेलिब्रेशन करण्यासाठी कोकण आणि गोव्याला चाललेल्या पर्यटकांची बुधवारी कोकण रेल्वे मार्गावर रखडपट्टी झाली. पनवेल येथील ब्लॉक तसेच उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या विशेष गाडय़ांचा कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मंगळवारी रात्री मुंबईत येणारी तेजस एक्प्रेस बुधवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचली. त्यामुळे परतीच्या प्रवासातही तिचे वेळापत्रक कोलमडले आणि प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. विशेष गाडय़ांसाठी नियमित गाडय़ा ‘सायडिंग’ला ठेवल्या जात असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई-ठाण्यातून मोठय़ा प्रमाणावर नागरिक कोकण आणि गोव्याला जातात. किंबहुना, उत्तर हिंदुस्थानातून येणाऱया पर्यटकांचे प्रमाण लक्षणीय असते. त्यामुळे नियमित गाडय़ांबरोबर विशेष गाडय़ांचा कोकण रेल्वे मार्गावर ताण येतो. अशातच मध्य रेल्वेने पनवेलजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे प्रवाशांच्या त्रास भर घातली. मंगळवारपाठोपाठ बुधवारी नियमित गाडय़ांचे वेळापत्रक कोलमडले. मडगावहून सीएसएमटीला येणारी तेजस एक्प्रेस मंगळवारी रात्री 12.30 वाजता पोहोचण्याऐवजी बुधवारी सकाळी 6.30 वाजता दाखल झाली. त्यामुळे तिचा मडगावच्या दिशेने सुरू होणारा परतीचा प्रवास खोळंबला. एरव्ही पहाटे 5.50 वाजता सीएसएमटीहून सुटणारी तेजस एक्प्रेस बुधवारी पाच तास उशिराने म्हणजेच 11 वाजता सुटली. याचा गोव्यात जाऊन ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्याचा बेत आखलेल्या प्रवाशांना फटका बसला. गाडीची संपूर्ण प्रवासात रखडपट्टी होत गेली. ही गाडी चिपळूण स्थानकात सवा सात तास उशिराने पोहोचली. इतर नियमित गाडय़ांच्या वेळापत्रकावर विशेष गाडय़ांचा परिणाम झाला.

‘तेजस’च्या जागी ‘वंदे भारत’ ट्रेन चालवण्याची मागणी

कोकण रेल्वेच्या नियमित गाडय़ांचे वेळापत्रक काटेकोर पाळण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाने ‘तेजस एक्स्प्रेस’च्या जागी ‘वंदे भारत’ ट्रेन चालवावी. जेणेकरून रेल्वे बोर्डाचे या गाडीकडे विशेष लक्ष राहील तसेच रत्नागिरी, कुडाळसारख्या स्थानकांतील प्रवाशांना ‘वंदे भारत’ गाडीचा पर्याय उपलब्ध होईल, अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वे प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली.