Budget 2026-27 : शिक्षणासाठीचा बजेट अर्थसंकल्पाच्या अडीच टक्क्यांवरून थेट 0.9 टक्क्यांवर आणला, काँग्रेसची अर्थसंकल्पावर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेते यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर तीव्र टीका करत शिक्षण, आरोग्य, कृषी आणि सामाजिक कल्याण क्षेत्रांतील निधी कपातीचा मुद्दा उपस्थित केला आहे. सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, 11 वर्षांपूर्वी शिक्षणाचा अर्थसंकल्प एकूण अर्थसंकल्पाच्या 4.5% इतका होता, मात्र तो आता घटवून 2.5% करण्यात आला आहे. तसेच उच्च शिक्षणासाठीचा वाटा 2.5% वरून थेट 0.9% पर्यंत खाली आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

श्रीनेते यांनी संरक्षण खर्चाबाबतही प्रश्न उपस्थित केला. पूर्वी संरक्षणासाठी एकूण अर्थसंकल्पाच्या 17% निधीची तरतूद होती, ती आता 13% पर्यंत घटवण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेवरही त्यांनी उपरोधिक टीका करत, उत्पादन क्षेत्राचा GDP मधील वाटा केवळ 12.8% का आहे? असा सवाल उपस्थित केला.

आर्थिक स्थितीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, आर्थिक वर्ष 2027 साठी नाममात्र GDP वाढ 10% इतकी दर्शवण्यात आली आहे, जी सध्याच्या आर्थिक वर्षापेक्षा कमी आहे. यावरून अर्थसंकल्पातील आकडे खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात करून साध्य करण्यात आल्याचे स्पष्ट होते, असा आरोप त्यांनी केला.

त्यांनी पुढे म्हटले की, आरोग्य, शिक्षण, शेती, सामाजिक कल्याण तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतील निधी सरकारने कमी केला आहे. देशातील अनेक भागांत दूषित पिण्याच्या पाण्यामुळे लोकांचे मृत्यू होत असतानाही सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राजकोषीय तुटीबाबत बोलताना सुप्रिया श्रीनेते यांनी सांगितले की, 4.4% इतकी दाखवलेली राजकोषीय तूट कौतुकास्पद नाही, कारण ती महत्त्वाच्या क्षेत्रांतील आणि भांडवली खर्चातील (कॅपेक्स) कपातीमुळे साध्य करण्यात आली आहे. याशिवाय, कमी महसुली उत्पन्नामुळे अर्थव्यवस्थेतील मंदी स्पष्ट होत असल्याचा दावा त्यांनी केला.

भांडवली खर्चावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आर्थिक वर्ष 2027 साठी जाहीर करण्यात आलेला ₹17,14,523 कोटींचा कॅपेक्स आकडा विश्वासार्ह वाटत नाही, कारण मागील अर्थसंकल्पांमध्ये कॅपेक्सची परिस्थिती पाहता याच वर्षी ₹1,44,376 कोटींची मोठी कपात करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.