
जालना येथील औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्या एमआयडीसी फेज-३ परिसरात ठिंबक सिंचन साहित्य तयार करणार्या कंपनीला अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. आगीचे लोट इतके
प्रचंड होते की, धूर दुरूनही अगदी स्पष्ट दिसून येत होता.
या आगीमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. ही आगीची घटना कंपनीच्या उत्पादन विभागात घडली. उत्पादन विभागातून अचानक धूर निघताना दिसला आणि काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. प्लास्टिक व रसायनयुक्त साहित्य असल्यामुळे आग झपाट्याने पसरली.
कंपनीतील कर्मचार्यांनी तात्काळ बाहेर पळ काढत अग्निशमन दलाला माहिती दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तब्बल चार गाड्या दाखल झाल्या. सुमारे ८० लिटर विशेष रसायनांचा वापर करत जवानांना आग विझवण्यात यश आले.
या आगीत कंपनीतील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साहित्य, तयार माल आणि काही महत्त्वाचे उपकरण जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.आर्थिक नुकसान किती झाले, याचा अधिकृत अंदाज अद्याप समोर आलेला नाही; मात्र नुकसान कोट्यवधींच्या घरात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावेळी अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अग्निशमन अधिकारी एस. बी. दराडे, फायरमन
संतोष काळे, नितेश ढाकणे, रविनाथ बनसोडे, जॉन गवळी, सादिक अली, चालक यंत्र चालक विनायक चव्हाण, पंजाबराव देशमुख, वाहन चालक संजय हिरे यांनी आगीवर नियंत्रण आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी परिश्रम घेतले.



























































