बांगलादेशातील हिंदुंसह अल्पसंख्याकांचे संरक्षण करणार; नव्या सरकारमधील हिंदू मंत्र्याची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशात तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमधील एकमेव हिंदू मंत्री निताई रॉय चौधरी यांनी सांगितले आहे की, प्रशासन हिंदुंसह सर्व अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आणि हिंदुस्थानशी सौहार्दपूर्ण संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच देशात कोणत्याही कट्टरपंथी किंवा अतिरेकी विचारधारेला प्रोत्साहन देण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

निताई रॉय चौधरी (७७ वर्ष) यांची तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सरकारमधील एकमेव हिंदू मंत्री आहेत आणि बीएनपीच्या केंद्रीय समितीचे उपाध्यक्ष आहेत. शपथ घेतल्यानंतर एका विशेष मुलाखतीत त्यांनी सांगितले की सरकार सर्व अल्पसंख्याकांची सुरक्षा सुनिश्चित करेल आणि देशात देशात अतिरेकी विचारधारा पसरू देणार नाही.

चौधरी यांनी सांगितले की २०२४ मध्ये हसीना देश सोडून गेल्या तेव्हा परिस्थिती खूप वाईट होती. त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका करत असा आरोप केला की अवामी लीगच्या राजवटीत साक्षरता दर वाढवण्यासाठी ९८ टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्तेशिवाय उत्तीर्ण करण्यात आले. संस्कृतीच्या मुद्द्यावर ते म्हणाले की मागील सरकारने देशाच्या सांस्कृतिक वारशाचे नुकसान केले आणि अश्लील नृत्य आणि संगीताला प्रोत्साहन दिले. नवीन सरकार विविधतेत एकतेची भावना मजबूत करेल आणि पारंपारिक सांस्कृतिक मूल्ये पुनर्स्थापित करेल.

अल्पसंख्याकांच्या विशेषतः हिंदूंच्या सुरक्षिततेबद्दल त्यांनी सांगितले की अलीकडच्या निवडणुकीत हिंदू मतदारांचा मोठा सहभाग हे दर्शविते की ते स्वतःला देशाचा अविभाज्य भाग मानतात. ते म्हणाले की हिंदू समुदाय आता कोणत्याही पक्षासाठी केवळ व्होट बँक बनू इच्छित नाही. पंतप्रधान आणि बीएनपी नेत्यांनी दिलेल्या सुरक्षेच्या आश्वासनानंतर, हिंदू मतदारांनी मोठ्या संख्येने आपला पाठिंबा दर्शविला. त्यांनी असा दावा केला की २९७ संसदीय जागांपैकी सुमारे ८० जागांवर हिंदू मतदार निर्णायक भूमिका बजावतात. पूर्वी, हा पाठिंबा प्रामुख्याने अवामी लीगला गेला होता, परंतु आता त्यांचे जनमत बदलल्याचे त्यांनी सांगितले.