
मुख्यमंत्र्यांचा कंत्राटदारधार्जिणा व शेतकरीविरोधी वादग्रस्त शक्तिपीठ महामार्ग रेटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी परभणीतील शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिसी अत्याचाराचा निषेध आज झालेल्या ‘शक्तिपीठ’बाधित शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीत करण्यात आला. दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी सोमवारी (23 रोजी) राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, विधानसभा अधिवेशनकाळात मुंबईत गोलमेज परिषद तसेच ग्रामसभांचे महामार्गाविरोधात ठराव घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपताच महाराष्ट्र सरकारने शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा होणारा विरोध मोडून काढून तो रेटण्याचा ‘ट्रेलर’ काल (दि. 20) परभणीत सहजपूर आणि जवळा या गावांमध्ये शासकीय अधिकारी व पोलिसांनी दाखविला. महिला व शेतकऱयांवर झालेल्या अमानुष अत्याचाराचा आज राज्यव्यापी ऑनलाइन बैठकीमध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तर, येत्या सोमवारी (23 रोजी) विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यभर मोर्चे, धरणे, निदर्शने, ‘रास्ता रोको’ आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबईत बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची व नागरी संघटनांची मिळून आठ दिवसांत गोलमेज परिषद आयोजित करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजन क्षीरसागर, परभणीचे शेतकरी कैलास चांगभले, सांगलीचे दिगंबर कांबळे, लातूरचे गजेंद्र येळकर, नांदेडचे सुभाष मोरलवार, बीडचे व्यंकटराव ढोरे, हिंगोलीचे बापूराव ढाके, धाराशिवचे संभाजी फडतरे, सोलापूरचे गणेश घोडके यांनीही शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला.
शेतकऱयांच्या बाजूने लढणार – आमदार सतेज पाटील
– काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘गरज नसलेला हा महामार्ग मुख्यमंत्री केवळ कंत्राटदारांचे हित लक्षात ठेवून रेटत आहेत. यासाठी परभणीत शेतकऱयांवर अमानुष अत्याचार केला गेला. यापुढे हा अत्याच्यार वाढण्याची शक्यता असली, तरी शेतकरी एकजुटीने तो परतवून लावतील. यापुढेही मी स्वतः शेतकऱयांच्या बाजूने लढत राहणार असून, अधिवेशनात विरोधकांची एकजूट करून आवाज उठवणार आहे.’
सरकारला महामार्ग रद्द करावाच लागेल – राजू शेट्टी
– माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘ज्या गावात मोजणी होत आहे, त्या गावांत इतर जिह्यांतील शेतकऱयांनी जाऊन संघर्ष करणे गरजेचे आहे. शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार होत आहे. मोबदल्याबाबत शेतकऱयांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात आहे. सरकारला हा महामार्ग रद्द करावाच लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. परभणीतील शेतकऱयांवरील अत्याचार निंदनीय आहे. पूर्वीसारखे ग्रामसभांचे ठराव नव्याने करूया. धाराशिवमध्ये हा महामार्ग होऊ देणार नाही.
– कैलास पाटील, आमदार धाराशिव
शेतकऱयांना अमानुष मारहाण ही सर्व ब्रिटिश सरकारची लक्षणे आहेत. मुख्यमंत्र्यांना शेतकऱयांच्या थडग्यावर महामार्ग बांधायचा आहे; पण त्यांचे मनसुबे उधळून लावू.
-गिरीश फोंडे, समन्वयक संघर्ष समिती
चंदगडमध्ये महामार्ग ओढवून घेण्याची भूमिका चुकीची आहे.गोव्याला जाणारे पाच मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे चंदगडमध्ये महामार्ग होऊ देणार नाही.
– शिवाजी पाटील, आमदार भाजप
नव्या रेखांकनानुसार करवीरच्या इतर भागातून रस्ता गेल्यास शेतकऱयांसहित जनतेचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात संघर्ष करू.
– ऋतुराज पाटील, माजी आमदार

























































