“मोदींच्या संपूर्ण पक्षाने आणि सर्व यंत्रणांनी आम्हाला…” मद्य घोटाळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर मनीष सिसोदिया यांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपातूीन राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह 22 आरोपींची निर्दोष मुक्तता केली. गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे म्हणत कोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यानंतर मनीष सिसोदिया यांनी एक्सवर सत्यमेव जयते! अशी पोस्ट केली. यावेळी त्यांनी मोदी सरकारवरही हल्ला चढवला.

सत्यमेव जयते! आज पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदर्शी विचारांचा आणि त्यांनी तयार केलेल्या संविधानाचा अभिमान वाटत आहे. मोदींचा संपूर्ण पक्ष आणि सर्व यंत्रणांनी आम्हाला बेईमान सिद्ध करण्याचे सर्व प्रयत्न करूनही, आज हे सिद्ध झाले आहे की अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया हे कट्टर प्रामाणिक आहेत, असे ट्विट मनीष सिसोदिया यांनी केले आहे.

केजरीवाल ढसाढसा रडले

दरम्यान, कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांना भावना अनावर झाल्या आणि माध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मोदी-शहा यांनी षडयंत्र रचले आणि त्यांनी आम्हाला भ्रष्टाचारी ठरवले होते. पण आज सत्याचा विजय झाला आहे, असे केजरीवाल यावेळी म्हणाले.

मी भ्रष्ट नाही… न्यायालयाने निर्दोष मुक्तता करताच केजरीवाल ढसाढसा रडले

सत्तेच्या लालसेपोटी आमच्यावर खोटे आरोप लावले

“या जगात कुणीही कितीही ताकदवान झाले तरी, ईश्वराच्या शक्तीच्या पुढे जाऊ शकत नाही. अरविंद केजरीवाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे जगले आणि देशाने खूप प्रगती करावी हेच त्यांचे लक्ष्य आहे. परंतु या लोकांनी सत्तेच्या लालसेपोटी आमच्यावर खोटे आरोप लावले. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदनाम केले, त्रास दिला. परंतु या संकटाच्या क्षणी ज्या लोकांनी आम्हाला साथ दिली त्यांचे आभार”, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनिता यांनी दिली.

दरम्यान, राऊज एव्हेन्यू कोर्टाच्या या निर्णयाला सीबीआय हाय कोर्टामध्ये आव्हान देणार आहे.