सौदीच्या हद्दीत विचित्र आवाज अन् 7 तासांचा थरार; लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान पुन्हा दिल्लीत परतलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या अत्याधुनिक एअरबस A350-900 विमानाला गुरुवारी तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा दिल्लीत परतावे लागले. हे विमान हवेत जवळपास सात तास होते. त्यानंतर सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आले. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

एअर इंडियाचे AI111 हे विमान गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास दिल्लीहून लंडनसाठी रवाना झाले होते. विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत असताना विमानात विचित्र आवाज ऐकू आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या संशयास्पद तांत्रिक समस्येमुळे पायलटने खबरदारीचा उपाय म्हणून विमान पुन्हा दिल्लीकडे वळवण्याचा निर्णय घेतला. जवळपास चार तास लंडनच्या दिशेने प्रवास केल्यानंतर, हे विमान वळवण्यात आले आणि दुपारी साडे बाराच्या सुमारास ते पुन्हा दिल्लीत उतरले.

विमान सुरक्षितपणे उतरले असून एअर इंडियाच्या उच्च सुरक्षा मानकांनुसार त्याची सखोल तांत्रिक तपासणी केली जात आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि त्यांना लवकरात लवकर लंडनला पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे, असे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. दरम्यान, या विमानात किती प्रवासी होते, याची अचूक माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

15 दिवसात दुसऱ्यांचा तांत्रिक बिघाड

दरम्यान, गेल्या 15 दिवसात याच विमानामध्ये दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाड झाला होता. याआधी 15 मार्च रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने न्यूयॉर्कहून दिल्लीला येणारे हे विमान आयर्लंडमधील शॅनन शहराकडे वळवावे लागले होते.