
नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्या पार्श्वभूमी होणारी भाविकांची होणारी गर्दी, भाविकांची सुरक्षितता, जून महिन्यातील पावसाचे प्रमाण याबाबी विचारात घेऊन मंदिर व परिसराचे काम वेळेत पूर्ण होण्याकरिता श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांना नित्यदर्शनाकरिता ९ एप्रिल पासून पुढे ३१ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
सन २०२७ मधील नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ २०२५ च्या अनुभवाच्या आधारे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्याप्रमाणात भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता विचारात घेण्यासोबतच वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सुरु आहे. कुंभमेळ्यावेळी श्री क्षेत्र भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जुन्या सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्याने नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून पायरी मार्गाचे काम देखील सुरू सुरू आहे. सद्यस्थितीत मुख्य सभामंडप पूर्ण उतरवून नवीन सभामंडप बांधकाम प्रगतीपथावर आहे. सभामंडप बांधकामासाठी लागणारे बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड व अन्य यंत्रसामुग्री मंदिर परिसरात असल्याने, चालू कामांचे स्वरुप, भौगोलिक परिस्थिती व भाविकांची संख्या विचारात घेता बांधकाम सुरु असताना भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मंदिर दर्शनासाठी खुले ठेवणे धोकादायक आहे. मंदिर सभामंडपाचे साधारणतः ७५ टक्के बांधकाम पूर्ण झाले असून घुमटाचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच मंदिराकडे जाणा-या प्रवेशमार्गावरील पायरीमार्गाचे काम प्रगतीत असून प्रवेशमार्ग पुर्णतः बंद आहे.
श्री क्षेत्र भीमाशंकर हा अतिवृष्टीचा प्रदेश असून जून ते सप्टेंबर या कालावधीत येथे अत्यंत जास्त पावसाचे प्रमाण असते. माहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरु होण्याची शक्यता विचारात घेता, त्यापूर्वी ही कामे जलदगतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. यामुळे सद्यस्थितीत विकास कामांना गती देण्यात आलेली आहे. भाविकांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.

























































