राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावून मुख्यमंत्री खुर्चीला घट्ट चिकटून बसलेयत, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपुरमधील आरएसएस मुख्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटके (जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स) सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर नागपूरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

”नागपुरच्या अत्यंत संवेदनशील असलेल्या ठोसर वैश्य चौक, सेंट्रल ॲव्हेन्यु (CA) रोड भागात १५ जिलेटीन च्या कांड्या व ५० डिटोनेटर्स आढळून आल्या आहे. याचाच अर्थ देशातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात सुरक्षित शहर मानले जाणारे नागपूर आज नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात सुरक्षित नसल्याचं म्हणावं लागेल. राज्याचे मुख्यमंत्री / गृहमंत्री स्वतः नागपूरचे असूनही जर नागपूर शहरात राज्याचा गृह विभाग, गुप्तचर यंत्रणा फेल होत असतील तर या अशा गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा तरी काय अधिकार आहे ? महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष नेते असलेले फडणवीस वारंवार राजीनामा मागायचे आता राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेची पूर्णपणे वाट लावून खुर्चीला घट्ट चिकटून बसले आहेत”, अशी जोरदार टीका सपकाळ यांनी केली आहे. सपकाळ यांनी याबाबत ट्विट केले आहे.