
अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. हे गलिच्छ राजकारण असून आपण संयम बाळगलाय, असे राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. या प्रकरणी त्यांनी आपली बाजू मांडत या प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
हे तर गलिच्छ राजकारण pic.twitter.com/SvvBtU6qHC
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 4, 2020
कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश,लोकप्रियता ज्यांना खुपते, त्यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकीत करणारा आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
सिनेसृष्टी म्हणजेच बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा काही गुन्हा नाही. सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू जितका दुर्दैवी आहे तितकाच धक्कादायकही आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा खोलवर तपास करत आहेत व महाराष्ट्रातल्या पोलिसांना जागतिक प्रतिष्ठा आहे, पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक या प्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो की, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापी होणार नाही. फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. याप्रश्मी मी आजही संयमानेच वागत आहे. अशाप्रकारे चिखलफेक करून सरकार व ठाकरे परिवारास बदनाम करता येईल, या भ्रमात कोणी राहू नये, असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.