कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका! तीन पालकमंत्री आहेत कुठे? आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मान्सूनच्या पहिल्याच पावसात मुंबईची दैना होण्यास जबाबदार असणाऱया कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाका, अशी मागणी करीत मुंबई बुडत असताना तीन पालकमंत्री आहेत तरी कुठे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबई तुंबण्याला अधिकारीही जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

मुंबईत सोमवारपासून एण्ट्री केलेल्या पावसाने महापालिका आणि सरकारचे दावे सपशेल फेल ठरवून मुंबईची तुंबई केली. नाल्यांमधील गाळ, अर्धवट रस्ते आणि ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळे मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी पालिका आणि सरकारसमोर ‘एक्स’वर सडकून टीका केली आहे. पाणी उपसण्याच्या कामामध्ये पंपांची देखभाल न करणाऱया पंत्राटदारांना 100 टक्के काळय़ा यादीत टाका, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. पालकमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात कार्यालयाच्या जागेसाठी अतिक्रमण केले. मग मुंबई ही त्यांची जबाबदारी नाही का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

‘हे’ लोक शहर चालवू शकत नाहीत!

मुंबईत तुंबल्यानंतर एकमेकांवर आरोप करणं सोपं आहे. ते जबाबदारीपासून पळ काढू शकतात, पण एक गोष्ट स्पष्ट आहे. सरकारमधील ‘हे’ लोक शहर चालवू शकत नाहीत.

‘या’ प्रश्नांची उत्तरे द्या!

पालकमंत्र्यांवर मुंबईची जबाबदारी नाही का?

मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांचे काय?

मान्सूनपूर्व बैठकांचे काय? मुंबई का तुंबली?

मी वारंवार प्रश्न उपस्थित केलेल्या रस्ते घोटाळय़ाचे काय?