धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीची दादागिरी चालणार नाही , आदित्य ठाकरे यांचा इशारा

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली अदानीला तब्बल 540 एकर जमीन फुकटात देण्यात आली. शिवाय धारावीबाहेरील 600 एकर जमीन फुकटात देण्यात येत आहे. अदानी जिथे बोट ठेवेल ती जागा त्याला दिली जात आहे. मात्र आम्ही यापुढे हे खपवून घेणार नाही. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली कुणाचीही दादागिरी चालू देणार नाही. कुणाचाही ‘मालक’ आला तरी मुंबई घशात घालू देणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज ठणकावले.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या ‘अदानी प्रेमा’चा बुरखाच फाडला. धारावीचा पुनर्विकास झालाच पाहिजे. मात्र रहिवाशांचे अधिकार जैसे थेच राहिले पाहिजेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अदानीला शेकडो एकर जागा मोफत देणार, मात्र अदानी पालिकेचा साडेसात हजार कोटींचा प्रीमियम भरणार नाही, असे कसे चालणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धारावीतील 540 एकर जागा दिल्यानंतर धारावीबाहेर मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, अक्सा आणि अदानी जिथे बोट ठेवेल ती सुमारे 600 एकर जागा फुकटात घशात घातली जात आहे, मात्र आम्ही आता हे चालू देणार नाही. कारण मुंबई ही काही ‘निगोशिएबल’ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रस्तावित असणारी जेट्टी मोठय़ा कॉण्ट्रक्टर मित्रासाठी बांधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ही जेट्टी बांधताना आधी स्थानिक रहिवासी, कोळी बांधव यांना विश्वासात घ्या, अशी मागणीही करतानाच जेट्टीच्या नावाखाली तुमचे खिसे भरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

राज्य, शहर कसे चालते ते दाखवा!

गेल्या तीन वर्षांत भ्रष्टनाथ शिंदे यांनी पालिकेची ‘सुरक्षा ठेव’ असलेल्या 92 हजार कोटींची एफडी मोडल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. आमची सत्ता असताना हिंदमाता, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल अशी वर्षानुवर्षे तुंबणारी ठिकाणे पूरमुक्त करून दाखवली. मात्र आता या ठिकाणी पाणी कसे तुंबते, असा सवालही त्यांनी केला. मुंबई तुंबली असताना पालकमंत्री पालिकेच्या ऑफिसमध्ये जाऊन बसतात. दीडशे वर्षांत असे घडले नाही. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवा आणि आपण कुठल्या पदावर बसलात याचे भान राखून राज्य, शहर कसे चालते हे दाखवा, असे आव्हानच आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिले.

पुनर्विकासात धारावीकरांना नक्की काय मिळणार?

पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीत नक्की काय करणार हे समोर आलेच पाहिजे, असे ते म्हणाले. धारावीकरांना 500 स्क्वेअर फुटांचे घर तर मिळालेच पाहिजे, शिवाय या ठिकाणी पोलीस, पालिका कर्मचारी वसाहतीही निर्माण केल्या पाहिजेत. पुनर्विकासात या ठिकाणचे पुंभारवाडे, कोळीवाडा यांचे काय होणार? लेदर, फुड इंडस्ट्रीचे काय होणार हे स्पष्ट करा. स्थानिकांशी बोला, असेही ते म्हणाले.