FIR-FIR खेळण्यासाठी दिल्लीतील जनतेने तुम्हाला निवडलेले नाही; केजरीवाल यांनी भाजपला फटकारले

जनतेची कामे करण्याऐवजी भाजप दिल्लीत FIR-FIR चा खेळ खेळत आहे. तुम्ही 25 वर्षांनी सत्तेत परतला आहात. जनतेने तुम्हाला एफआयआर नोंदवण्यासाठी निवडून दिलेले नाही. मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज आणि सतेंद्र जैन यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करून तुम्ही काय साध्य केले? असा सवाल करत आता हे खेळ थांबवून जनतेची कामे करा, असे आपाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपला फटकारले आहे. दिल्लीतील झोपडपट्ट्यांवरील सुरू असलेल्या कारवाईविरोधात आम आदमी पक्षाने रविवारी जंतरमंतरवर निदर्शने केली. त्यावेळी केजरीवाल यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला.

अरविंद केजरीवाल म्हणाले, भाजप सरकारने झोपड्या पाडून लोकांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. झोपड्यांमध्ये राहणाऱ्यांना जवळच नोकऱ्या मिळतात. पण जेव्हा झोपड्या पाडल्या जातात तेव्हा रोजगार जातो. एक प्रकारे त्यांनी तुम्हाला उकळत्या तेलात टाकले आहे. निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते की जिथे झोपडी आहे, तिथे पक्के घर बांधणार, याचा अर्थ असा होता की जिथे झोपडी असते तिथली जागा मोकळी करणार आणि उद्योगपती मित्रांच्या घशात घालणार. मोदींची गॅरंटी खोटी आहे, असेही ते म्हणाले. निवडणुकीपूर्वी त्यांचे नेते तुमच्या घरात यायचे, त्यावेळा आपण जनतेला सावध केले हेतो की, हे नेते तुमच्या झोपड्या पाहण्यासाठी येत आहेत.आता त्यांनी कारवाई सुरु केली आहे.

भाजप सत्तेत येऊन फक्त 5 महिने झाले आहेत, परंतु दिल्लीतील गरिबांच्या घरांवर बुलडोझर चालवण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीपूर्वीच आपण सांगितले होते की जर भाजप सत्तेत आला तर हे लोक एका वर्षाच्या आत झोपडपट्ट्या पाडतील आणि त्यांच्या भांडवलदार मित्रांना जमीन देतील. जर झोपडपट्ट्यांवर बुलडोझर थांबवले नाहीत तर हे सरकार पाच वर्षे टिकणार नाही. रेखा सरकार अवघ्या तीन वर्षांत पडेल. या जंतरमंतरवरून काँग्रेस सरकार पडले, अण्णा आंदोलन येथून सुरू झाले. झोपडपट्ट्या पाडणे थांबवले नाही तर तुमचे सरकारही येथून पाडले जाईल, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.