Air India Plane Crash – “अत्यंत असंवेदनशील…”; दुर्घटना कोणी रोखू शकत नाही असे म्हणणाऱ्या अमित शहांवर काँग्रेसची सडकून टीका

अहमदाबादमधील भीषण विमान दुर्घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधताना एक वक्तव्य केले होते. “ही एक दुर्घटना आहे आणि दुर्घटना कोणी रोखू शकत नाही”, असे अमित शहा बोलले होते. यावरून काँग्रेसने अमित शहांवर सडकून टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांचं हे वक्तव्य अत्यंत असंवेदनशील असल्याचे म्हणत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी अमित शहांवर टीका केली आहे.

अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळून भीषण दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर पुढील काही तासांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबादमध्ये पोहोचले. त्यांनी दुर्घटनास्थळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर अमित शहा यांनी गुरुवारी माध्यमांना माहिती दिली. “ही एक दुर्घटना होती आणि दुर्घटना कोणी रोखू शकत नाही”, असे अमित शहा यावेळी बोलले होते. यावरून काँग्रसने अमित शहांवर निशाणा साधला आहे. “केंद्रीय गृहमंत्र्यांनी आता हेच म्हणायचे बाकी होते का? हे अत्यंत संवेदनशील आहे”, असे म्हणत जयराम रमेश यांनी अमित शहांवर टीका केली आहे.

Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान

काँग्रेस नेते पवन खेडा यांनीही अमित शहांवर टीका केली आहे. “एक विमान कोसळतं आणि लोक मारतात. अशावेळी भाषणबाजी करण्याऐवजी गृहमंत्र्यांनी किमान उत्तरदायी असल्याची ग्वाही तरी द्यायला हवी होती. दुर्घटना कोणी रोखू शकत नाही, असे शहा म्हणतात. जर कोणी दुर्घटना रोखू शकत नसेल तर मग आपल्याला मंत्र्यांची गरजचं काय?”, अशी टीका पवन खेडा यांनी केली आहे.

Air India Plane Crash – विमानाचा तुकडा चहाच्या दुकानावर पडला, 15 वर्षांच्या मुलाचा होरपळून मृत्यू; आई गंभीर जखमी

विमान अपघात ही दैवी घटना नाही, त्या टाळता येणे शक्य आहे. म्हणूनच आपल्याकडे विमान वाहतूक नियामक, सुरक्षा प्रोटोकॉल आणि संकटकालीन यंत्रणा आहेत. पण गृहमंत्र्यांचे लॉजिक पाहता आपण पायाभूत सुरक्षा सुविधा, नियमन किंवा आपत्कालीन सज्जतेत गुंतवणूक करणे पूर्णपणे थांबवावे का? एक दिवस नक्की येईल असे म्हणत ते फक्त नशिबावर सोडायचे का? असा सवाल पवन खेडा यांनी केला.