
अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान वसतिगृहावर कोसळल्याने विमानातील प्रवाशांसह वसतिगृहातील काही जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे जखमींची मृत्यूशी झुंज सुरू आहे तर दुसरीकडे प्रशासनाने वसतिगृह सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. प्रशासनाच्या या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आदेशाबाबत डॉक्टर पित्याने नाराजी व्यक्त केली आहे.
डॉ. अनिल आणि त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. अपघातावेळी ते दोघेही ड्युटीवर होते. तर त्यांची लहान मुलगी आणि मोलकरीण घरी होत्या. त्यामुळे विमान अपघातात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे मुलगी आणि मोलकरीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर दुसरीकडे प्रशासनाने त्यांना वसतिगृह रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाचा आदेश ऐकल्यानंतर डॉ. अनिल यांनी माध्यमांसमोर आपली वेदना व्यक्त केली आहे.
माझी मुलगी अजूनही रुग्णालयात, थोडी माणुसकी बाळगा
डॉ. अनिल यांची मुलगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे तर दुसरीकडे ते डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. अशातच अपघात घडलेल्या जागेची स्वच्छता करण्यासाठी आणि फॉरेन्सिक तपासणीसाठी वसतिगृहाची संपूर्ण इमारत रिकामी केली जात आहे. यासाठी वसतिगृ रिकामे करण्याचे आदेश डॉक्टरांना देण्यात आले आहेत. याबाबत डॉ. अनिल यांनी मीडियासमोर आपली वेदना कथन करत सरकारला आवाहन केले आहे.
माझी मुलगी अजूनही रुग्णालयात दाखल आहे. हात जोडून विनंती करतो की, दोन-तीन दिवसांचा वेळ द्यावा. माझ्यासोबत येथे कोणीही नाही. अशा परिस्थितीत, वसतिगृह रिकामे करणे अशक्य आहे. कृपया तुम्ही सर्वांनी माझा संदेश वरच्या लोकांना पाठवा. थोडी माणुसकी बाळगा, अशी विनंती डॉ. अनिल यांनी केली आहे.