Air India plane crash – 5 महिन्यांपूर्वी लग्न, नवरा लंडनमध्ये डॉक्टर; नव्या संसाराची स्वप्न घेऊन ‘ती’ विमानात बसली, पण…

एअर इंडियाचे बोईंग 787-8 ड्रीममलायनर हे विमान गुरुवारी अहमदाबादमध्ये कोसळले. लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणाऱ्या विमानामध्ये क्रू मेंबरसह 242 जण होते. यापैकी 241 जणांचा या अपघातात मृत्यू झाला. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. यासह विमान ज्या डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले तिथल्याही काही जणांचा यात मृत्यू झाला. या अपघातातून काही लोक आश्चर्यकारकरित्या बचावल्याचेही समोर आले आहे. अर्थात नशीबाने सर्वांनाच साथ दिली नाही. याच विमानातून प्रवास करणाऱ्या राजस्थानमधील खुशबू हिची काळीज पिळवटून टाकणारी कहाणी आता समोर आली आहे.

राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातील अराबा दुदावता या गावची रहिवासी असलेल्या खुशबू राजपुरोहित हिचे जानेवारी महिन्यात डॉ. विपूल सिंहशी लग्न झाले होते. लंडनमध्ये राहणारे विपूल हे डॉक्टर आहेत. लग्नानंतर व्हिजाची प्रक्रिया पार पाडायची असल्याने खुशबू हिंदुस्थानमध्येच राहिली होती. काही दिवसांपूर्वीच तिला व्हिजा मिळाला होता आणि पतीची भेट होईल या आनंदात ती लंडनला निघाली होती.

खुशबू हिचे सासर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील लुणी हे गाव असून लग्न झाल्यापासून ती तिथेच रहात होती. बुधवारी आपल्या गावाहून ती अहमदाबादला पोहोचली आणि तिथून ठरल्याप्रमाणे तिने एअर इंडियाचे विमान पकडले. डोळ्यात नव्या संसाराची स्वप्न होती, पतीची भेट होईल हा आनंदही होता. पण अवघ्या काही सेकंदात विमान मेघाणीनगर येथे कोसळले आणि खुशबूच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. यामुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Air India Plane Crash – सहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर लंडनला स्थायिक व्हायला निघालेलं जोशी कुटुंब, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं

दरम्यान, अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानातून उदयपूरचे आणखी काही जण प्रवास करत होते. यात रुदेडा गावचे वरद्री चंद्र मेनारिया, रोहिडा गावचे प्रकाश चंद मेनारिया, मार्लबचे व्यापारी पिकू मोदी यांची दोन मुलं शगून आणि शुभ यांचा समावेश आहे. हे दोघेही लंडनला शिकायला होते. त्यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला.

Air India Plane Crash- काय असतो MAYDAY CALL? पायलट हा संदेश कधी देतो