
एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणे सुरक्षित आहे की नाही, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. ड्रीमलायनर विमान कोसळल्याच्या घटनेनंतरही विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरू राहिले आहे. रविवारी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन विमानतळावर एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते विमान तासभर विमानतळावरच रखडले. उड्डाणापूर्वी बिघाड निदर्शनास आल्याने संभाव्य अपघात टळला. तांत्रिक बिघाडानंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
एअर इंडिया एक्प्रेसचे विमान हिंडन विमानतळावरून कोलकाताच्या दिशेने उड्डाण घेणार होते, मात्र विमानाच्या उड्डाणापूर्वी काही तांत्रिक बिघाड आढळून आला. विमान उड्डाण करण्याच्या शेवटच्या क्षणी कर्मचाऱ्यांना तांत्रिक बिघाड दिसून आला. त्यानंतर बिघाडाच्या दुरुस्तीसाठी अभियंत्यांना पाचारण करण्यात आले, परंतु दुरुस्ती करण्यास तासभरापेक्षा अधिक वेळ गेल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली. यावेळी एअर इंडिया प्रशासनाने प्रवाशांना तिकीट रद्द करून पूर्ण रक्कम परत घेण्याची ऑफर दिली.